दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास काय? चला तर जाणून घेऊया मूर्तीच्या पोटातील रहस्य
History Of Dagdusheth Halwai Ganpati: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर हे खूपच प्रसिद्ध आहे. ही मूर्ती पाहून एक मानसिक समाधानही मिळतं आणि अनेक भाविक इथे श्रद्धेने दर्शनाला येतात. पण प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा इतिहास वैयक्तिक दुःखद घटना, अथांग भक्ती आणि सामाजिक ऐक्य यांच्याशी जोडलेला आहे.(फोटो सौजन्य – istock)
या गणेश मूर्तीची स्थापना नक्की कधी झाली? आणि काय होतं कारण? १९ व्या शतकाच्या शेवटी कर्नाटकमधून पुण्यात येऊन दगडूशेठ हलवाई हे व्यापारी स्थायिक झाले होते. मात्र या काळात प्लेगची महाभयंकर साथ आली आणि यामध्ये एकुलत्या एक मुलाचे निधन दगडूशेठ यांना सहन करावे लागले. या गहन कौटुंबिक दुःखातून सावरण्यासाठी, त्यांच्या गुरूंनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना भगवान गणेश आणि दत्तात्रेय यांच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा करण्याचा सल्ला दिला.
यानंतर, दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी १८९३ मध्ये पहिल्या गणेश मूर्तीची स्थापना केली. त्या काळात, स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध जनतेला एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. दगडूशेठ हलवाई यांनीही या चळवळीत सक्रियपणे भाग घेतला आणि या उत्सवाला एक प्रमुख सार्वजनिक आणि सामाजिक कार्यक्रम म्हणून स्थापित केले. दगडूशेठ हलवाई हे केवळ मिठाईचे व्यापारी नव्हते तर स्वतः उत्तम कुस्तीपटूदेखील होते. त्या काळात गणपतीच्या मूर्ती या सहसा योद्ध्याच्या स्वरूपात असायच्या मात्र दगडूशेठ यांनी तयार करून घेतलेली ही मूर्ती आशिर्वाद देणारी आणि समाजाचे संरक्षण करण्याच्या स्वरूपात होती.
दगडूशेठ हलवाईच्या ज्या मूर्तीचं सध्या भाविक दर्शन घेत आहेत ती मूर्ती तिसरी आहे. दगडूशेठ यांच्या पत्नीने शिल्पकार नाईक यांच्याकडून ही मूर्ती बनवून घेतली होती ती दुसरी होती असं सांगण्यात येतं. तर ही तिसरी मूर्ती १९६८ मध्ये शिल्पकार शंकर अप्पा शिल्पी यांच्याकडून ही मूर्ती तयार करून घेण्यात आली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार पुण्यातील मुळामोठा संगमावर सूर्यग्रहणाच्या दिवशी धार्मिक विधीनुसार एक गणेश यंत्र तयार करण्यात आलं आणि ते यंत्र या मूर्तीच्या पोटात स्थापन करण्यात आल्यानंतर २७ ऑगस्ट, १९६८ रोजी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून ही मूर्ती स्थापित करण्यात आली.
Shivalilamrita: श्री शिवलीलामृताच्या १५ व्या अध्यायाचे रहस्य; ऐच्छिक असूनही का आहे हा अध्याय खास
आज, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते गरिबांना मदत करणे, वंचित मुलांना शिक्षण देणे, वृद्धाश्रम आणि मजुरांचे पुनर्वसन करणे यासह अनेक सामाजिक कार्ये देखील हाती घेते. कसा वाटला तुम्हाला हा इतिहास आम्हाला नक्की कळवा.






