एसटीचे 31 पैकी 21 विभाग तोट्यात; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला 'हा' इशारा
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत उत्पन्न वाढीचे ठोस परिणाम दिसून आले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावनती वा निलंबनासारखी शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
राज्यात एसटीचे ३१ पैकी २१ विभाग तोट्यात आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले, एसटी केवळ वाहतूक सेवा नसून, सामान्यांची जीवनवाहिनी आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य करून दिलासा दिला आहे. आता व्यवस्थापन व अधिकारी वर्गानेही जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ बैठका घेऊन किंवा कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे. यंदा एप्रिल व मे महिन्यात, भाडेवाढ लागू असूनही एसटीला तोटा सहन करावा लागला.
वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या दोन महिन्यांतील ही घसरण गंभीर असून, ती कशीच स्वीकारली जाणार नाही, असा सज्जड दम मंत्र्यांनी भरला आहे.
विशेष तपास पथक पूर्ण आढावा घेणार
महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. पथकामार्फत महामंडळातील आर्थिक अफरातफर व अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाईल. प्रवासी वाढ, उत्पन्नवाढ, फेऱ्यांचे नियोजन, खर्च नियंत्रण, बसचा कार्यक्षम वापर याचा आढावा घेऊन जबाबदारी ठरविणार असल्याचेही सांगण्यात आले.
बदली, डिमोशन, निलंबन करणार
एसटीची स्थिती सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांनी रिझल्ट देण्याची वेळ आहे. महिन्यानंतर कामगिरीवरून निर्णय घेतले जातील. गरजेनुसार बदली, पदावनती किंवा निलंबनासारखी कारवाई करण्यात येईल. काम करणाऱ्यांना पाठबळ मिळेल; मात्र अकार्यक्षमता, उदासीनता आणि निर्षक्रयता खपवून घेतली जाणार नाही.
– प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री






