विजेचा धक्का; तरुण तंत्रज्ञाचा मृत्यू (File Photo : electricity-shock)
नाशिकरोड : महावितरणच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराचा आणखी एक बळी नाशिकमध्ये गेला आहे. नाशिकरोड येथील जेलरोड परिसरातील आढाव मळा येथे वीज खांबावरील बिघाड दुरुस्त करत असताना अचानक हायव्होल्टेज करंट लागून महावितरणच्या एका २८ वर्षीय तरुण तंत्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आढाव मळा, पिंटो कॉलनी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर महावितरणच्या शिवाजीनगर कार्यालयात कार्यरत असलेले तंत्रज्ञ जय मुकुंद सकट (वय २८, रा. साईनाथनगर, जेलरोड) आणि त्यांचे सहकारी राजेश सुरेश चौरे (रा. जत्रा हॉटेल परिसर) हे दोघे बुधवार (दि. १) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज खांबावर दुरुस्तीचे काम करण्यासाठी चढले होते. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच, अचानक खांबामध्ये जोरदार विद्युतप्रवाह (हायव्होल्टेज करंट) उतरला. हा भीषण धक्का इतका मोठा होता की, दोघेही थेट खांबावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत जय सकट यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजेश चौरे हे गंभीर जखमी झाले.
बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला पुन्हा धमकी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. सध्या राजेश चौरे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
निष्काळजीपणाला जबाबदार कोण?
या भीषण दुर्घटनेमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शटडाऊन घेतला नव्हता का? मध्यरात्रीपासून शॉर्टसर्किट होत असताना आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना वीजपुरवठा पूर्णपणे खंडित का केला गेला नव्हता? तांत्रिक चूक की मानवी चूक? काम सुरू असताना अचानक वीजप्रवाह कसा सुरू झाला? सुरक्षा साधनांची वानवा? कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा साधने दिली गेली होती का? या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत, या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? याचा शोध घेण्यासाठी महावितरणकडून वरिष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
चिमुरड्याचे छत्र हरपले; कुटुंब पडले उघड्यावर !
मृत जय सकट हा कोविड काळानंतर महावितरण कंपनीत सेवेत रुजू झाला होता. अत्यंत गरिबीतून पुढे आलेल्या जय याच्या अचानक जाण्याने सकट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ आणि अवघ्या दोन वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे. कमावता तरुण मुलगा गमावल्याने जेलरोड परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे, तर महावितरणच्या कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.






