
'लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, पाच मृत्यूंना मनपा आयुक्त जबाबदार' नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप
शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवरून नागरिकांमध्ये सुरू असलेल्या असंतोषाचा कडेलोट होऊ लागला असून, आत्तापर्यंत रस्त्यांच्या कामांमुळे खड्डे पडून त्यात पाच जणांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत, निरपराधांचे बळी जात असतांना प्रशासन सुरत आहे. त्यातून आता लोकप्रतिनिधीनाही जाब विचारला जात असल्याने त्याला मंत्री छगन भुजब (chhagan bhujbal) यांनी वाट करून दिली. प्रसार माध्यमांशी बोलतांना भुजबळ यांनी, मनपाच्या हलगर्जीपणामुळे पाच मृत्यू झाल्याचा आरोप केला. एकाला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय असे चालणार नाही. या अपघातांची जबाबदारी कोणी तरी घ्यावीच लागेल. राज्यात उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रविण गेडाम यांची ओळख आहे, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करावा, त्यांनी पुढाकार घ्यावा असा सल्लाही भुजबळांनी दिला.
सुंदर नाशिकमध्ये जे काही चालले आहे, ते निषेधार्ह आहे अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करून, ज्यांच्यावर त्यांची जबाबदारी आहे तेच जर एकमेकांकडे बोट दाखवित असतील तर कोण कोणावर कारवाई करणार असा सवाल उपस्थित करून भुजबळ यांनी, महापालिकेला काय अधिकार असतात हे मला कोणी समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. दोन वेळा मंबईचा महापौर होतो. शहरात एक वीट हलवायची असेल तरी महापालिका आयुक्तांची ती जबाबदारी आहे. अशा वेळी नाशिकसाठी कुंभमेळ्याच्या नावाखाली प्राधिकरणाचे नावे बोटे मोडून उपयोग नाही. महापालिका आयुक्तांना याची जबाबदारी घ्यावीच लागेल असे ठासून सांगितले.
शहरातीरस्त्यांच्या प्रश्नावर महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आलेले कुंभमेळामंत्री गिरीष महाजन यांना मनसेने घेराव घातला. दुपारी दिड वाजताच मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मनपात शहर अभियंत्याच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आयुक्तांच्या दालनाकडे वळविला. ‘नाशिकचे खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे’, ‘आमदारांचे काही चालेना, गिरीष महाजन ऐकेना’ अशा घोषणांनी मनपा दणाणून सोडली. सुमारे तासभर चाललेल्या या घोषणाबाजीनंतर मंत्री गिरीष महाजन यांनी बाहेर येवून आंदोलकांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत, अजून दोन, तीन महिन्यात परिस्थिती पुर्वपदावर येईल असे आश्वासन दिले. परंतु आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यांनी दोषींवर कारवाई करा, मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना एक कोटी रूपयांची मदत करा अशी मागणी केली. यावेळी आंदोलकांनी बळी गेलेल्या पाचही व्यक्तींना महापालिकेतच श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, अंकूश पवार, मनोज घोडके, तुषार जगताप, ललीत वाघ, तुषार पाटील, प्रफुल्ल बेदरो, गणेश शेजवळ, मेघराज नवले, राहूल पाटील आदी उपस्थित होते.