खड्डे की मृत्यूचा सापळा? खड्ड्याने घेतला उद्योजकाचा बळी; नाशिकमध्ये अपघातानंतर ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप
२८ जुलै रोजी अंबड एमआयडीसी परिसरातील एक्सलो पॉइंटजवळ झालेल्या अपघातात उद्योजक निलेश कोतकर यांचा मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला आणि ते खाली पडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. निलेश कोतकर यांच्या पश्चात पत्नी, अवघी तीन वर्षांची मुलगी, आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Nashik News: ‘रस्ते की खड्डे?’ सिंहस्थाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी; नागरिकांचा प्रशासनावर संताप
पतीच्या मृत्यूनंतर निलेश कोतकर यांच्या पत्नीने व्यक्त केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. “आता माझी तीन वर्षांची मुलगी कुणाला बाबा म्हणणार?” असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला. तर निलेश यांच्या आईने या मृत्यूसाठी सरकार आणि प्रशासनालाच थेट जबाबदार धरले आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी नागरिकांचा जीव वाचवणे हे प्रशासनाचे पहिले कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या दुर्घटनेनंतर नाशिकमधील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, ठाकरे गट आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक होत महापौरांच्या दालनात धडकले असून, महापौर येईपर्यंत दालन सोडणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे, मृत निलेश कोतकर यांच्या नातेवाईकांनी शहर अभियंत्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असताना महापौर हिमगौरी आडके या शहरातील विविध भागांची पाहणी करत असल्याची माहिती समोर आली. महापौर आणि आयुक्त बराच वेळ दालनात नसल्याने ठाकरे गटाने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
२४ मार्च – प्रभाकर निकम
६ जून – प्रवीण गायकवाड
२५ जुलै – दीपाली बेळे
२८ जुलै – उद्योजक निलेश कोतकर
या सलग घटनांमुळे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या ठिकाणांची दुरुस्ती करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून होत आहे. निलेश कोतकर यांच्या मृत्यूनंतर नाशिकमधील रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, प्रशासन आता कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






