केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्राह्मण समाजाचे नाव घेत आरक्षणावर वक्तव्य केले (फोटो - सोशल मीडिया)
Nitin Gadkari Reservation Statement : नागपूर : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक मोर्चा काढत जनआंदोलन उभे केले आहे. तर त्यांना ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध केला जात आहे. एकीकडे हैदराबाद गॅझिट लागू झाल्यामुळे बंजारा समाजाची आरक्षणाची मागणी वाढली आहे. आरक्षणामुळे राज्यामध्ये जोरदार वादंग निर्माण झालेला असताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य करताना त्यांनी ब्राम्हण समाजामधील असल्याबाबत मत व्यक्त केले आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरु आहे.
नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केले. आम्हाला आरक्षण न दिल्यामुळे मी देवाचे आभार मानतो असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. ते म्हणाले की, “मी ब्राह्मण जातीचा आहे. मी नेहमी गंमतीने सांगतो की, आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही,” असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “महाराष्ट्रात बामणांना फार महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांचं खूप महत्त्व आहे. मी तिकडे जातो तेव्हा दुबे, त्रिपाठी मिश्रा, या ब्राह्मण समुदायाचं राज्य पॉवरफूल आहे. जसं इकडे मराठा जातीचे महत्त्व आहे, तसं तिकडे ब्राह्मण समाजाचे महत्त्व आहे. मी त्यांना म्हणालो की, मी जातपात मानत नाही. कोणताही माणूस जात, पंथ, धर्म आणि लिंग यापैकी कोणत्याही घटकामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. समाजात ज्यांची मुलंबाळं चांगली शिकली आहेत, त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे,” असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यात आरक्षणाचा गुंता सुटेना
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आणि आंदोलन केले. जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी केली. आझाद मैदानावरील पाच दिवसीय उपोषणानंतर जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या असून याबाबत शासन आदेश देखील काढण्यात आला आहे. मात्र यावरुन ओबीसी समाज नाराज झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये असून नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राज्यात हैदराबाद गॅझिट लागू करण्यात आले आहे. धनगर आरक्षण, बंजारा आरक्षण, नाभिक, धोबी महादेव कोळी आणि इतर समाजही आरक्षणाविषयी मैदानात उतरले आहेत. ही सर्व प्रकरणे सुरु असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य आल्यामुळे चर्चांना उधाण आले.