फोटो सौजन्य - Social Media
रिसोड : गेल्या दोन महिन्यांत घरगुती एलपीजी, व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या कुटुंबांसाठी इंधन दरवाढीने आणखी अडचणी निर्माण केल्या असून, “महागाईच्या काळात जगायचे कसे?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारने एप्रिल २०२६ मध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे ७५ रुपयांची वाढ केली. त्यानंतर अनेक शहरांमध्ये १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ९८० ते १,००० रुपयांहून अधिक झाली आहे. याचा थेट परिणाम गृहिणींच्या मासिक बजेटवर झाला असून, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा खर्च वाढल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे.
व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही टप्प्याटप्प्याने वाढ झाली असून, त्याची किंमत २,२०० ते २,३०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे हॉटेल, खानावळ, भोजनालय, नाश्ता केंद्र, चहाच्या टपऱ्या, बेकरी आणि लघुउद्योजकांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. परिणामी, खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महागाईमुळे खाद्यतेल, साखर, चहा, डाळी, साबण यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दरही वाढले आहेत. मात्र, उत्पन्नात त्यानुसार वाढ न झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले आहे. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांसाठी तर ही परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, वाढत्या खर्चामुळे घर चालवणे कठीण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रिसोड परिसरातील गंगासागर चोपडे, तेजस्विनी रोडगे, ज्योती गाहे आणि लता खंदारे यांनी महागाईमुळे घरखर्चाचा ताळमेळ बसवणे अवघड झाले असून, सरकारने दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या मते, जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे.






