TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. युवक काँग्रेसने सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान भाजपा-महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. टीईटी पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
युवक काँग्रेसने आरोप केला की, रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच शनिवारी ठाण्यात फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. यामुळे लाखो उमेदवारांचे नुकसान झाले असून राज्य सरकारला एकही स्पर्धा परीक्षा पारदर्शकपणे घेता येत नसल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, अलीकडील विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला असून सरकारने याप्रकरणी जबाबदारी स्वीकारावी.
आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली. जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
यापूर्वी काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला होता. त्याआधी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरही आंदोलन करण्यात आले होते.
सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन छेडत काँग्रेसने टीईटी पेपरफुटीचा मुद्दा अधिक आक्रमकपणे लावून धरला असून, या प्रकरणावर सरकारची भूमिका आणि पुढील कारवाईकडे राज्यातील विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.






