फोटो - टीम नवराष्ट्र
पुणे : पुण्यामध्ये मागील दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा पाऊस झाला. यामध्ये शहराचे आणि नदीलगत असणाऱ्या वस्त्यांचे मोठे नुकसान झाले. खडकवासला धरणातून देखील हजारो क्युसेक पाणी सोडल्यामुळे शहर जलमय झाले होते. शहरात झालेला मुसळधार पाऊस आणि आलेले धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे त्यादिवशी सायंकाळी कात्रज लेकटाऊन या ठिकाणाहून एक युवक वाहून गेला. अक्षय साळुंखे, वय वर्ष २६ असे या तरुणाचे नाव आहे. वाहून गेल्याची नोंद अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सायंकाळी सहाच्या सुमारास झाली होती.
त्याचवेळी अग्निशमन दलाकडून प्रथम गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेण्यात आला होता. परंतू, धरण क्षेत्रातून वाढता विसर्ग व पाण्याचा प्रवाह यामुळेअनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यादिवशी शोध घेऊन ही युवक सापडला नाही. दुसऱ्या दिवशी दलाने घटनेचे गांभीर्य ओळखून गंगाधाम व कात्रज अग्निशमन वाहन लेकटाऊन व जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहन मनपा जवळील नदीपात्र येथे रश्शी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युध्दपातळीवर शोधकार्य करत होते. त्यावेळी आज (दि.27) सकाळी दहा वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळून आला. अग्निशमन दलाचे जवान यांनी जीवरक्षक राजू काची यांच्या मदतीने सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर घटनेत अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे, कमलेश चौधरी आणि सुमारे वीसच्या आसपास जवान यांनी सहभाग घेतला. तसेच या घटनेत पोलिस विभाग, जीवरक्षक, ड्रेनेज विभाग यांचे ही सहकार्य लाभले.