सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहानानंतर पुणे पोलिसांनी देखील इंधन व खर्चावर नियंत्रण आणण्यास सुरूवात केली असून, पुण्यातील व्हीआयपी दौऱ्यांदरम्यान रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे ताफे आता निम्मे करण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. इंधन बचत, सरकारी खर्चावर नियंत्रण आणि साधेपणाला प्राधान्य देण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांकडून व्हीआयपींच्या कॉन्व्हॉयमधील वाहनांची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी कमी केली जाणार आहे. त्यामुळे यापुढे शहरातील व्हीआयपी दौरे कमी वाहनांत पार पडणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन व परकीय चलन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर राज्य सरकारनेही विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तात्काळ प्रभावाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरच्या दौऱ्यांदरम्यान निर्धारित संख्येपेक्षा अधिक वाहने ताफ्यात नसतील, याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांसह इतर खात्यांच्या प्रमुखांवर सोपवली आहे.
त्यानुसार आता पुण्यातही ताफ्यातील वाहने कमी होणार आहेत. याबाबत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पूर्वी एखाद्या व्हीआयपी दौऱ्यासाठी सुरक्षा आणि प्रोटोकॉलनुसार साधारण १२ ते १३ वाहनांचा ताफा ठेवला जात होता. मात्र, आता ही संख्या कमी करून केवळ ५ ते ६ वाहनांपर्यंत मर्यादित केली जाईल. विशेषत: अनेक व्हीआयपी व्यक्ती स्वतःहून फोन करून आपल्या दौऱ्यात कमीत कमी वाहनांचा वापर करण्याची विनंती करत असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.
हे सुद्धा वाचा : पुणेकरांची परदेशवारी सुसाट; मागील पाच वर्षांत पासपोर्ट अर्ज दुप्पट
ताफा कमी; वाहतूक कोंडीतूनही दिलासा?
पुण्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यात व्हीआयपी दौऱ्यावेळी मोठा वाहन ताफा असतो. या ताफ्यामुळे संबंधित रस्ता तसेच परिसरातील वाहतूकीवर परिणाम पडतो. वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा सिग्नल बंद ठेवून वाहतूक रोखावी लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, आता व्हीआयपी ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
आवश्यक सुरक्षा कायम ठेवत व्हीआयपी ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात येत आहे. त्यानुसार दौऱ्यांची आखणी केली जात आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर.






