सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/आकाश ढुमेपाटील : “विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या चार ते सहा महिन्यांत हे दोन्ही मार्ग भक्तांसाठी पूर्णतः खुले होतील,” अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गुरुवारी हडपसर ते दिवेघाट ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते फलटण येथे माध्यमांशी बोलत होते.
यावेळी गडकरी यांनी पालखी मार्गाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला. ६,६२५ कोटी रुपये खर्चाचा २३४ किलोमीटर लांबीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि ४,४१६ कोटी रुपये खर्चाचा १३० किलोमीटरचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत. यातील ज्ञानेश्वर महाराज मार्गावर लोणंद ते बारामती टप्प्याचे ९५ टक्के काम झाले असून, दिवेघाट ते हडपसर या आव्हानात्मक टप्प्याचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तुकाराम महाराज पालखी मार्गावरही बारामती ते इंदापूर दरम्यान ७० टक्के काम पूर्ण झाले असून इंदापूर ते तोंडले टप्पा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
घाटातील रस्त्याची रुंदी वाढवली
या महामार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तयार केलेली स्वतंत्र मार्गिका. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वाहनांचा अडथळा येऊ नये, यासाठी ही विशेष सोय करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना रस्ता ओलांडण्यासाठी इलेक्ट्रिक लिफ्टची सुविधा असलेले आधुनिक ‘फुट ओव्हर ब्रिज’ उभारले जाणार आहेत. दिवेघाटातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी या घाटातील रस्त्याची रुंदी वाढवून तो २ ते ४ पदरी करण्यात आला आहे.
उर्वरित कामांसाठी नव्या मंजुरीची घोषणा
केवळ रस्ते बांधणीवर न थांबता, गडकरी यांनी जेजुरीसाठी २५० कोटींचा फ्लायओव्हर, फलटण शहराच्या अंतर्गत सुधारणेसाठी ९७ कोटी आणि पंढरपूर रिंग रोडच्या उर्वरित कामांसाठी नव्या मंजुरीची घोषणा केली. तसेच, वाखरी येथे दोन्ही पालखी मार्ग जिथे एकत्र येतात, त्या ठिकाणी १०० कोटी रुपये खर्चून एक भव्य ‘भक्ती-शक्ती’ संगम जंक्शन उभारण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
मार्गावर ४० हजार नवीन झाडे लावली
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या मार्गावर ४० हजार नवीन झाडे लावण्यात आली असून, त्यामध्ये संतांच्या साहित्यात उल्लेख असलेल्या पारंपरिक वृक्षांना प्राधान्य दिले आहे. तसेच महामार्गासाठी मुरूम-माती काढताना तयार झालेल्या खड्ड्यांचे रुपांतर ४६ तलावांमध्ये करण्यात आले असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसाठी मोठे जलसाठे निर्माण झाले आहेत. या पायाभूत सुविधांमुळे वारकऱ्यांच्या श्रद्धेला आधुनिकतेची जोड मिळून या भागाच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केले.
नव्या विकासकामांचा धडाका!
‘‘गडकरी साहेब इकडेही लक्ष द्या!’ या मथळ्याखाली नवराष्ट्रने पालखी महामार्गावर त्रुटींकडे लक्ष वेधले होते, त्या त्रुटींना अनुसरूनच नवीन कामांच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.
नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाच्या पाहणीदरम्यान जाहीर केलेली नवी प्रमुख कामे:
जेजुरी : भाविकांच्या सोयीसाठी २ किमी लांबीचा उड्डाणपूल (किंमत २५० कोटी रु.)
फलटण : शहर रस्ते सुधारणा आणि ‘राव रामोसे’ पुलाच्या रुंदीकरणासाठी ९७ कोटींची तरतूद.
नीरा रोड : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ७२ मीटर लांबीचा नवा रेल्वे ओव्हर ब्रिज ( आरओबी).
पंढरपूर : ९.५० किमीचा नवा बायपास, ज्यामुळे शहराचा ‘रिंग रोड’ पूर्ण होऊन अपघात कमी होतील.
तोंडले : दोन्ही पालखी मार्ग जिथे एकत्र येतात, त्या ठिकाणी १०० कोटींचा भव्य उड्डाणपूल.
हे सुद्धा वाचा : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक






