फोटो सौजन्य - Social Media
पंढरपूर | शिवाजी हळणवर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा थेट आणि सकारात्मक परिणाम आता उजनी धरणावर दिसू लागला आहे. मंगळवार (७ जुलै) सायंकाळी ६ वाजेपर्यंत दौंड नदी मापन केंद्रातून तब्बल १ लाख ५६ हजार १८७ क्युसेक्स वेगाने पाणी उजनी धरणात दाखल होत असून, धरणातील पाणीसाठ्यात तासागणिक मोठी वाढ होत आहे. त्यामुळे उजनी धरण आता ‘डेड स्टोरेज’मधून बाहेर पडून ‘प्लस’मध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
सायंकाळी ६ वाजेपर्यंत उजनी धरणाची जलपातळी ४९०.३५० मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण पाणीसाठा १६७२.७६ दशलक्ष घनमीटर (५९.०७ टीएमसी) झाला असून, उपयुक्त पाणीसाठा अद्याप उणे १३०.०५ दशलक्ष घनमीटर (-४.५९ टीएमसी) म्हणजेच उणे ८.५७ टक्के आहे. धरणाचे जलव्याप्ती क्षेत्रही वाढून १८५.०७ चौ.कि.मी. इतके झाले आहे.
दौंडहून येणाऱ्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्यामुळे उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. पुणे जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस असाच दमदार पाऊस सुरू राहिल्यास उजनी धरण उद्यापर्यंत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.मात्र, या आनंदाच्या बातमीला एक वेगळीच वेदनेची किनार आहे. ज्या सोलापूर जिल्ह्याचे जीवन उजनीवर अवलंबून आहे, त्याच जिल्ह्यात पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे. दिवसभर सुसाट वारे, आकाशात दाटलेले काळेकुट्ट ढग आणि तरीही पावसाचा एक थेंब नाही, अशी स्थिती अनेक भागांत पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप रखडल्या आहेत, तर काहींनी मोठ्या धाडसाने केलेल्या पेरण्या आता पावसाअभावी धोक्यात आल्या आहेत. उगवलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एकीकडे उजनी भरत असल्याचा आनंद असला, तरी दुसरीकडे स्वतःच्या शिवाराकडे पाहताना काळजी अधिक वाढत आहे.
उजनी भरतेय ही आनंदाची बाब आहे, पण आमच्या शेतात दोन सरी पाऊस पडल्याशिवाय हा आनंद पूर्ण होणार नाही, अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. काही जण तर धरण भरतंय… पण आमचं शिवार अजूनही तहानलेलं आहे,अशा शब्दांत आपल्या मनातील व्यथा मांडत आहेत. उजनीतील वाढता पाणीसाठा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचन आणि रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार असला, तरी खरी गरज आज खरीप पिकांसाठी वेळेवर पडणाऱ्या पावसाची आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली असली, तरी शेतकऱ्यांची एकच प्रार्थना आहे.उजनीत पाणी वाढतच राहो आणि त्याचवेळी सोलापूरच्या शिवारावरही वरुणराजाची कृपादृष्टी होवो. कारण धरण भरल्याने भविष्यातील तहान भागेल; पण आजच्या पिकांना वाचवण्यासाठी आकाशातून पडणारा पाऊसच सर्वात मोठा आधार आहे.






