पालकमंत्री उदय सामंत (फोटो- सोशल मीडिया)
रत्नागिरी जिल्ह्यात पंचायत समित्यांवर शिवसेनेची सत्ता
रत्नागिरी जिल्ह्यात विरोधक नामशेष
आजच्या झेडपी अध्यक्ष निवडीकडे लक्ष
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका दि. ९ मार्च रोजी पार पडल्या असून, सर्वच पंचायत समित्यांवर शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. विशेष म्हणजे या सर्व निवडी बिनविरोध झाल्याने विरोधकांचे अस्तित्त्व जवळपास नामशेष झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या पूर्वसंध्येलाच पालकमंत्री उदय सामंत यांनी संभाव्य नावांची यादी जाहीर केली होती.
आजच्या झेडपी अध्यक्ष निवडीकडे लक्ष
नियोजनबद्ध रणनीतीमुळे आणि दिलेल्या शब्दाला मान देत जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांमध्ये विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. पंचायत समित्यांवरील या विजयानंतर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरणाचे केंद्रबिंदू दि. १६ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीकडे वळले आहे. ही दोन्ही पदेही शिवसेनेकडेच राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्या निवडीदेखील बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करु नका, अन्यथा…; उदय सामंत यांचा अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना कडक इशारा
प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर शिवसेनेचेच सदस्य विराजमान होतील. संबंधित नावांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे संकेत दिले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काही ज्येष्ठ आणि अभ्यासू सदस्यांच्या नावांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रशासनावर पकड असलेल्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व देऊ शकणाऱ्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे १६ मार्च रोजी होणाऱ्या नावांच्या घोषणेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा : “परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र…”; उदय सामंत विधानसभेत काय म्हणाले?
अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना कडक इशारा
‘आम्ही शेवटी प्रशासनात आहोत, कुणी मंत्री म्हणून काम करतोय तर कुणी पदाधिकारी म्हणून. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर जबाबदारीने काम केले पाहिजे. मात्र, ज्यांना वैयक्तिक राजकारण करायचे असेल त्यांनी ते या जिल्हा परिषदेच्या गेटच्या बाहेर ठेवावे. जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.






