पुणे: मान्सूनच्या आगमनामुळे सह्याद्री पर्वतरांग हिरवाईने नटत आहे. धबधबे, ओढे आणि नाले प्रवाहित होत आहेत. या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आणि ट्रेकर्स सह्याद्रीकडे आकर्षित होत असताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने (एएमजीएम) केले आहे.
महासंघाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावसाळ्यात निसरड्या वाटा, दाट धुके, कमी दृश्यमानता, वेगवान पाण्याचे प्रवाह, दरडी कोसळण्याचा धोका आणि अचानक बदलणारे हवामान यामुळे अपघातांची शक्यता वाढते. धबधब्यांच्या प्रपाताखाली जाणे, धोकादायक कड्यांवर सेल्फी घेणे, पाण्याच्या प्रवाहात उतरून साहस करणे किंवा अपरिचित भागात भटकणे यामुळे दरवर्षी अनेक दुर्घटना घडत असल्याचे महासंघाने नमूद केले आहे.
राज्यातील विविध गिर्यारोहण संस्था आणि स्वयंसेवक बचावकार्यात कार्यरत असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (एमएमआरसीसी) हे आपत्कालीन बचावकार्याचे समन्वय केंद्र म्हणून काम करत आहे.
खिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष, उमेश झिरपे म्हणाले की, ‘सह्याद्रीतील पावसाळा हा निसर्गाचा अद्भुत अनुभव आहे. मात्र, साहस करताना सुरक्षिततेची चौकट विसरता कामा नये. पर्यटकांनी जबाबदारीने वर्तन केल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. सह्याद्रीचा आनंद घ्या; पण सुरक्षिततेची तडजोड करू नका.’
महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर
२४x७ हेल्पलाईन : ७६२०-२३०-२३१






