फोटो सौजन्य - Social Media
करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील देवळाली येथे सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेती पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन वेगाने वारे वाहू लागले. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, येथील रोहिदास वाघ यांच्या घरावरील पत्रे हवेत उडून लांब फेकले गेले. या दुर्घटनेत घरातील लक्ष्मी रोहिदास वाघ आणि अनुष्का वाघ या दोघींना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
केवळ वाघ कुटुंबच नव्हे, तर गावातील संजय दामोदरे, दादा गाडे आणि प्रकाश दामोदरे,कल्याण अनंतराव कानगुडे यांच्या घरांवरील पत्रे देखील वाऱ्याने उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील संसार उघड्यावर पडल्याने या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. गावातील बस स्टँड परिसरातही वादळाचा प्रभाव दिसून आला असून, तेथील झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कल्याण कानगुडे यांच्या घरावरील पत्रे तर शंभर फूट दूर उडून गेल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले असून रात्रभर पावसात दुसरीकडे त्यांना काढावी लागली.
पिकांचे अतोनात नुकसान; शासकीय मदतीची मागणी
या वादळी वाऱ्याचा मोठा फटका परिसरातील शेतीलाही बसला आहे. काढणीला आलेली पिके जमिनीदोस्त झाली असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे.
वादळामुळे झालेल्या या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित कुटुंबांना तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी आग्रही मागणी देवळालीतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.






