मुंबई-बंगळूर महामार्गावरील कोंडी फुटणार; देहूरोड ते सुतारवाडीदरम्यान 15 किमीचा 'सिक्स लेन' एलिव्हेटेड कॉरिडॉर
पिंपरी : मुंबई-बंगळूर महामार्गावर पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीत होणारी भीषण वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवले पुलाला जोडणारा देहूरोड ते सुतारवाडी असा सुमारे १५.८७ किलोमीटर लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर (उड्डाणपूल) प्रस्तावित करण्यात आला. यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुसाट होणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी पुण्यातील नवले पुलाच्या सद्यस्थितीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी देहूरोड ते सुतारवाडी या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाबाबत सभागृहात विचारणा केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली.
नाशिक फाटा-खेडच्या धर्तीवर विकास
नाशिक फाटा ते खेड दरम्यान ज्याप्रमाणे आठ पदरी एलिव्हेटेड मार्ग साकारला जात आहे, त्याच धर्तीवर देहूरोड-सुतारवाडी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) या मार्गाचे भूसंपादन, सेवा रस्त्यांचे (सर्व्हिस रोड) रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले. आगामी काळात महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी हा रस्ता मैलाचा दगड ठरणार आहे.
आयटी हब आणि उपनगरांसाठी ‘वरदान’
हिंजवडी आयटी पार्क आणि लगतच्या गावांमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. या प्रस्तावित कॉरिडॉरमुळे खालील भागांना थेट लाभ मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड : वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत आणि किवळे. पुणे शहर : बालेवाडी, बाणेर, सुस आणि बावधन. ग्रामीण परिसर : माण, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई.
प्रवास वेगवान करणार नाही तर…
“देहूरोड ते सुतारवाडी हा १५.८७ किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर केवळ प्रवास वेगवान करणार नाही, तर शहराच्या कनेक्टिव्हिटीला मोठी चालना देईल. भूसंपादन आणि सेवा रस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून या कामाला गती देण्याची आमची आग्रही मागणी आहे. या प्रकल्पासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”
– शंकर जगताप, आमदार
हेदेखील वाचा : Mumbai Pune Expressway: काय सांगता! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी, पण ‘हे’ पत्र ठरणार अनिवार्य






