वाई एसटी स्टँड परिसरात वाहतूक कोंडीचा कहर; एसटीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक व पर्यटक त्रस्त
वाई : वाई शहरातील एसटी स्टँड परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाई-पाचगणी मुख्य रस्त्यावर एसटी बसची ये-जा केवळ एकाच गेटमधून होत असल्याने सतत वाहतूक अडथळे निर्माण होत आहेत.
पर्यटन हंगामात वीकेंडच्या काळात ही परिस्थिती अधिकच बिकट होत असून, रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे. या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून, भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. एसटी डेपोच्या अंतर्गत सुरू असलेले काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. काम सुरू होऊन बराच कालावधी उलटून गेला तरी ते पूर्ण झालेले नाही. संबंधित ठेकेदारावर कोणतीही जबाबदारी निश्चित न करता कामकाज ढिम्मपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. किती दिवसांपासून काम सुरू आहे, ते का पूर्ण होत नाही, याबाबत प्रशासन मौन बाळगून असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या ठिकाणी तातडीने ट्रॅफिक पोलिस कर्मचारी नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. मुख्य रस्त्यावर सतत निर्माण होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे शहराची प्रतिमा मलिन होत असून, पर्यटनावरही विपरीत परिणाम होत आहे. वाईसारख्या पर्यटननगरीत अशी बेफिकीर व्यवस्था शोभणारी नाही. संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करण्यास गती द्यावी व वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रम राबवायला सुरूवात
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने पाऊल टाकत ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
हेदेखील वाचा : देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची…; हर्षवर्धन सपकाळांची टीका






