नांदेड वाघाळा महापालिका विरेंद्रसिंघ गाडीवाले स्थायी समिती अध्यक्ष होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Waghala News : नांदेड : मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सोमवार २३ रोजी उमेदवारी दाखल केला असून एकमेव अर्ज आल्यामुळे सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड होणार आहे, आज (दि.24) सकाळी ११ वाजता होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे. स्थायी समितीच्या सभापती पदासाठी विरेंद्रसिंघ गाडीवाले, सदाशिव पुरी, अभिषेक सौदे, सुमित मुथा, दिपाली मोरे आदींची नावे चर्चेत होती. (Nanded News)
मात्र विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सोमवारी दुपारी आपला उमेदवार अर्ज नगरसचिव तथा उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू यांच्याकडे सादर केला. यावेळी महापौर कविता मुळे उपमहापौर दिपकसिंह रावत, किशोर स्वामी, दिलीप कंदकुर्ते, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे, अभिषेक सौदे, सदाशिव पुरी, उमेश पवळे, तुलजाराम यादव, संदीपसिंघ गाडीवाले, सदिच्छा सोनी, सुमित मुथा आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा : महिला आयोग अध्यक्षानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद देखील जाणार? रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार
तिजोरीची चावी उत्तरकडेच
यापूर्वीही विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी स्थायी समितीचे सभापती पद भूषविले असून त्यांना पुन्हा सभापती पदाची संधी देण्यात आली. मनपाच्या तिजोरीची चावी उत्तर नांदेड भागाकडेच ठेवण्याचे काम खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे. नव्या चेहऱ्याला संधी देण्याऐवजी ‘जुने ते सोने व म्हणत गाडीवाले यांना संधी देण्यात आली. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असून कर्जाचा भार डोक्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे.
हे देखील वाचा : पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडलं; आता प्रतिष्ठेची बनली लढाई
उखडलेल्या नगरसेवकांचे रस्त्याकडे अजूनही दुर्लक्ष
शहरातील नागरिकांच्या संयमाचा अंत पाहायला मिळत असून नांदेड महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा मानला जाणारा शंकरराव चव्हाण पुतळा ते भाग्यनगर चौक दरम्यानचा प्रमुख रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून उखडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे, धूळ आणि दगडधोंडे यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून अपघातांचाही धोका वाढला आहे. विशेषतः रुग्णवाहिका, शालेय बस आणि दैनंदिन प्रवासी यांना याचा मोठा फटका बसत आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत.






