
या बैठकीत उपस्थित नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शहरात येणारे बहुतेक सर्व रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. काम पूर्ण करण्यासाठी कोणतीही निश्चित वेळमर्यादा पाळली जात नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाईकरांचे आरोग्य धोक्यात आले असून, अर्धवट कामांमुळे रोज लहान-मोठे अपघात घडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका स्थानिक बाजारपेठेला बसला आहे. रस्ते खोदल्यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली असून, अनेक छोट्या व्यावसायिकांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. काही दुकानदारांनी तर “दुकान बंद ठेवण्याची वेळ आली आहे” अशी हतबलता व्यक्त केली. दुसरीकडे, रस्त्यावरील धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे, विशेषतः फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, ज्यामुळे आर्थिक संकट गडद झाले आहे.
बैठकीदरम्यान उपस्थितांनी एकमुखाने मागणी केली की, रस्त्यांची कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित पाणी फवारणी करावी आणि खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह दीप्ती पिसाळ, तेजपाल वाघ, जितू पिसाळ, यशवंत जमदाडे, रोहित वाडकर यांसह नगरसेवक, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या बैठकीनंतर तरी वाईच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.