सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रातील मान्सूनची सक्रियता काहीशी कमी झाली असली तरी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १६ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडेलच असे नाही. स्थानिक हवामान परिस्थितीनुसार, काही भागांतच पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. चंद्रपूरच्या सिंदेवाही आणि जळगावच्या भडगाव येथे प्रत्येकी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यात पावसाचे वितरण अद्याप असमान असल्याचे दिसून येते. अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असताना काही ठिकाणी अल्पावधीत जोरदार सरी कोसळत आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची अक्षीय रेषा सध्या महाराष्ट्रापासून उत्तरेकडे सरकली आहे. दक्षिण उत्तर प्रदेश आणि लगतच्या मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याच्या प्रभावामुळे परिसरात चक्रीवादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्रातही उंच पातळीवर चक्रीवादळीय अभिसरण सक्रिय आहे. या हवामान प्रणालींमुळे राज्यात पावसाची गतिविधी सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या सर्वदूर मुसळधार पावसाऐवजी काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याचा अंदाज आहे.
अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तराखंड आणि झारखंडमध्येही मेघगर्जनेसह पाऊस राहील असा अंदाज आहे. दक्षिण आणि पश्चिम भारतातील केरळ, किनारपट्टीवरील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका आणि मैदानी भागात पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.






