(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘बाहुबली: द बिगिनिंग’, ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांच्या जागतिक यशानंतर दिग्दर्शक एस.एस. राजामौली आता त्यांच्या पुढील महाकाय चित्रपट ‘वाराणसी’च्या माध्यमातून आणखी एका भव्य सिनेमॅटिक अनुभवाची तयारी करत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नव्या उंचीवर नेण्याची क्षमता असलेला हा चित्रपट सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.
एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा ॲक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून, महेश बाबू, प्रियंका चोप्रा जोनास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजामौली यांच्या खास भव्य मांडणी, अप्रतिम व्हिज्युअल्स आणि दमदार कथनशैलीची झलक या चित्रपटातून पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
अॅनेसी अॅनिमेशन फेस्टिव्हलमधील ‘वर्क-इन-प्रोग्रेस’ पॅनलमध्ये ‘बाहुबली: द इटर्नल वॉर’च्या टीमची ओळख करून दिल्यानंतर राजामौली यांनी ‘वाराणसी’ चित्रपटाबाबत खुलासा केला आहे. राजामौली यांनी सांगितलं की, “मी एवढंच सांगू शकतो की आम्ही चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. सर्व मोठ्या प्रमाणावरचे आणि महत्त्वाचे ॲक्शन सीक्वेन्सही पूर्ण झाले आहेत. सध्या आम्ही छोट्या आणि एकमेकांशी जोडलेल्या प्रसंगांचं चित्रीकरण करत आहोत. त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण शूटिंग पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.”
चित्रपट IMAX फॉरमॅटमध्ये चित्रीत करताना त्यांच्या क्रिएटिव्ह दृष्टिकोनात सांगताना त्यांनी केवळ फॉरमॅटसाठी कोणताही बदल केला नाही. फक्त सिनेमास्कोप आणि आयमॅक्स या दोन्ही फॉरमॅटमध्ये फ्रेमिंग उत्तम दिसेल, यासाठी सुरुवातीला काही छोटे बदल करावे लागले. काही दिवसांतच आम्हाला त्याची योग्य पद्धत समजली असं सांगितलं.
एकीकडे ‘वाराणसी’ वर काम सुरू असताना, दुसरीकडे ‘बाहुबली’ फ्रँचायझी ईशान शुक्ला दिग्दर्शित ‘द इटर्नल वॉर’ या आगामी अॅनिमेटेड चित्रपटाद्वारे भारतीय अॅनिमेशन उद्योगाला जागतिक स्तरावर आणखी बळकट करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘बाहुबली’ च्या अॅनिमेटेड सिक्वेलचं काम आणि ‘वाराणसी’ सारख्या भव्य चित्रपटाचं काम यामधील समतोल राखण्याबद्दल बोलताना राजामौली म्हणाले की, ‘बाहुबली’चं विश्व आधीच इतकं समृद्ध आहे की कथा पुढे नेणं सहज शक्य होतं.
“आमच्याकडे *‘बाहुबली’*चं पूर्ण विश्व आधीच तयार आहे. त्यामुळे त्या विश्वात पुन्हा प्रवेश करताना नव्याने फार विचार करावा लागत नाही. त्यानंतर ईशान शुक्लासारखा दिग्दर्शक जेव्हा त्यात सहभागी होतो, तेव्हा सुरुवातीला तो पात्रांना किती समजून घेतो हे पाहतो. एकदा खात्री पटली की तो योग्य दिशेने जात आहे, तेव्हा मी मागे होतो आणि त्याला पूर्ण स्वातंत्र्य देतो.”
भारतातील अॅनिमेशन उद्योग अद्याप लाइव्ह-अॅक्शन चित्रपटांइतका विकसित नसला तरी ‘बाहुबली’ अॅनिमेशनमध्येही यशस्वी ठरेल, असा त्यांना पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल सांगाताना राजामौली म्हणाले, “आम्हाला नेहमीच विश्वास होता की ‘बाहुबली’ या माध्यमातही प्रभावी ठरेल. योग्य टीम, योग्य कथा आणि योग्य विस्तार मिळणं महत्त्वाचं होतं. जेव्हा ईशानने ‘बाहुबली’ला भारतीय पुराणातील १४ लोकांमध्ये घेऊन जाण्याची कल्पना मांडली, तेव्हाच मला वाटलं की आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो हाच आहे.”
‘द इटर्नल वॉर’ ची निर्मिती करताना जागतिक प्रेक्षकांनाही लक्षात ठेवण्यात आलं आहे. राजामौली यांच्या मते, अॅनिमेशन माध्यमामुळे अभिव्यक्तीची व्याप्ती अधिक वाढते. याबद्दल सांगाताना राजामौली म्हणाले, “भारतीय कथांचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रंग. मी फक्त दृश्य रंगांबद्दल बोलत नाही, तर पात्रं, भावना आणि त्या व्यक्त करण्याच्या शैलीबद्दल बोलतो आहे. हे भारताचं वेगळेपण आहे. ‘बाहुबली’ किंवा ‘आरआरआर’ आवडलेल्या प्रेक्षकांना आणखी असंच काहीतरी पाहायचं आहे. लाइव्ह-अॅक्शनमध्ये जे शक्य नसतं, ते अॅनिमेशनमध्ये सहज साध्य होतं. त्यामुळे ‘द इटर्नल वॉर’ ते नक्की साकारेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
अॅनिमेशनमधील लवचिकतेमुळे ‘द इटर्नल वॉर’ची कथा आणखी भव्य स्वरूपात सादर करता येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांच्या मते चित्रपटाचा पाया नेहमीच भावना असतात. याबद्दल सांगाताना राजामौली म्हणाले, “माझ्यासाठी भावना आणि भव्यता या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. भावना हे बीज असतं आणि त्या बीजातून उगवणारं विशाल झाड म्हणजे भव्यता. त्यामुळे जेव्हा तुम्ही बीज निवडता, तेव्हाच त्या झाडाचं रूप काय असेल, हे ठरतं.”
२०२७ मध्ये *‘वाराणसी’*च्या प्रदर्शनासोबतच हैदराबादमध्ये आयमॅक्स थिएटरचं पुनरागमन होणार असल्याने राजामौली यांनी आनंद व्यक्त केला. याबद्दल सांगाताना राजामौली म्हणाले, “हैदराबाद आणि तेलुगू भाषिक राज्यांतील प्रेक्षक हे जगातील सर्वात मोठे चित्रपटप्रेमी आहेत. ते फक्त तेलुगू चित्रपटच नाही, तर हिंदी, तमिळ, मल्याळम आणि इंग्रजी चित्रपटांवरही तितकंच प्रेम करतात. त्यामुळे त्यांना स्वतःचं आयमॅक्स थिएटर मिळणं पूर्णपणे योग्य आहे.”
त्यांनी आठवण करून दिली की, हैदराबादमधील प्रसाद आयमॅक्समध्ये एकेकाळी जगातील सर्वोत्तम ७० एमएम आयमॅक्स प्रोजेक्टर होता याबद्दल सांगाताना राजामौली म्हणाले, “डिजिटल आयमॅक्स आल्यानंतर अनेक बदल झाले आणि इतर शहरांमध्ये आयमॅक्स थिएटर्स सुरू झाले, पण आमच्याकडे ते राहिलं नाही. चित्रपटप्रेमी म्हणून ती आमच्यासाठी खूप निराशाजनक बाब होती. आता पुन्हा आयमॅक्स परतत असल्याने मला खूप आनंद होत आहे.”
‘वाराणसी’ मधील महेश बाबू यांचा रुद्र, पृथ्वीराज सुकुमारन यांचा कुंभ आणि प्रियंका चोप्रा जोनास यांचा मंदाकिनी या भूमिकांमधील फर्स्ट लुक आधीच प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगवली आहे. या दमदार झलकांमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आता प्रेक्षक ७ एप्रिल २०२७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या भव्य सिनेमॅटिक अनुभवाची आतुरतेने वाट पाहत आहेत.






