(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ‘स्वामी गुरुमाऊली’ हे भक्तीमय गाणं नुकतंच प्रेक्षकांसमोर आले आहे. स्वामींचा महिमा अपरंपार असून त्यांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो.अभिनेता सनी कांबळे आणि तेजस पानसरे यांनी ‘टाइमलेस स्लेट्स’ नावाचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. या बॅनरअंतर्गत गाणी, शॉर्ट फिल्म्स, फीचर फिल्म्स आणि जाहिराती बनवण्याचा त्यांनी मानस दर्शवला आहे.‘स्वामी गुरुमाऊली’ हे गाणं या बॅनरखाली प्रदर्शित झालं असून, त्याचे दिग्दर्शन अभिनेता सनी कांबळे यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘विशू’, ‘एका ब्रेकअपची गोष्ट’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
श्री स्वामी समर्थांचा संदेश आपल्या आत्मविश्वासाला अजून बळ देतो. या संदेशाला साकारत “स्वामी गुरुमाऊली” हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हृदयस्पर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी या गाण्यात अभिनेता प्रियेश चव्हाण, रुहान गांगणे, साक्षी मोरे, पद्मश्री उपळे, अनिकेत ढोले, मानसी अडगळे, श्रीषा घुबडे, रोहन कुलकर्णी आणि सारिका देशमुख यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.गाणं ऋषभ साठे, शीतल गद्रे आणि बालगायक मल्हार यांनी गायले असून, संगीताची रचना प्रज्वल यादव यांनी केली आहे. गाण्याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सनी कांबळे यांनी केले आहे. तर निर्मिती तेजस पानसरे आणि सनी कांबळे यांनी केली असून, छायाचित्रण रोहित जेंकेवाड यांनी साकारले आहे.
अभिनेता सनी कांबळे यांनी गाण्याच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितलं की, “जेव्हा मी रेकॉर्ड लेबल सुरू करण्याचा विचार केला, तेव्हा सुरुवात स्वामींच्या गाण्यापासून करायचं ठरवलं. माझा मित्र तेजस पानसरे आणि मी या गाण्याची निर्मिती केली आहे. या चार महिन्यांच्या प्रवासात प्रितम कांबळे यांनी मनापासून काम करून साथ दिली; त्याशिवाय हे गाणं पूर्णत्वाला पोहचू शकत नव्हते.”संगीतकार प्रज्वल यादव आणि एडिटर विनय शिंदे यांनीही या गाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सनी कांबळे म्हणतात की, “माझ्या अपेक्षेपेक्षा सुंदर टीझर आणि गाणं तयार झालं. जेव्हा आम्ही टीझर एडिट करत होतो, तेव्हा त्यातील वाक्य खरोखरच खरी वाटत होती:‘आयुष्य जेव्हा आपल्याला गुडघ्यावर बसवत, तेव्हा तिथूनच उभं राहण्याची ताकद मिळते. राग मनात ठेवला की तो आपल्यालाच चारतो. पण श्रद्धा आणि संयम माणसाला नव्याने घडवतात. देवावर रुसण्यापेक्षा स्वतःकडे पाहिलं तर उत्तर सापडू शकतं. जगाला दोष देणं सोप्प असतं, पण प्रेमाने पाहिलं तर ते वेगळच दिसत. संकट येतात म्हणजे देव दूर गेला नाही; कदाचित तो आपल्याला मजबूत करत असतो.’ या टीझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून, भक्तीभाव आणि प्रेरणादायी संदेश यांचा संगम सर्वांना भावतो आहे.
पुढे सनी गाण्याविषयी सांगतात. “हे गीत एका तरुणाच्या भावनिक प्रवासाची कथा सांगते. तो जीवनावर आणि स्वामींवर रागावतो, त्याच्या मनात श्रद्धेऐवजी प्रश्न निर्माण होतात. दुःख, राग आणि संभ्रम यांच्या प्रवासातून तो हळूहळू पुन्हा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवू लागतो. ही कथा भक्ती, विश्वास आणि स्वामी समर्थांच्या कृपेची जाणीव करून देणारी आहे.गाण्याच्या माध्यमातून भक्तीभाव आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम प्रेक्षकांना दिसतो असून, याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.






