तुळशी विवाहानंतर लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात होते. हिंदू धर्मात लग्न सोहळ्याला विशेष महत्व आहे. लग्नाचे सर्व विधी विधिवत पद्धतीने साजरा केला जातो. याशिवाय लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्राशिवाय विवाह सोहळा अपूर्णच राहील. लग्नात घातले जाणारे मंगळसूत्र हे केवळ दागिन्यांपुरते मर्यादित नसून ते भारतीय संस्कृतीत विवाहित स्त्रीच्या वैवाहिक स्थितीचे, सौभाग्याचे आणि पती-पत्नीमधील अतूट बंधनाचे प्रतीक आहे. आज आम्ही तुम्हाला लग्न सोहळ्यात नव्या नवरीचे गळ्यात मंगळसूत्र का घातले जाते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
भारतीय संस्कृतीत विवाहित स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र का घालतात?

गळ्यात मंगळसूत्र घालणे हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जाते. यामुळे पती-पत्नीमधील शारीरिक आणि आध्यात्मिक बंध दर्शवते.

मंगळसूत्रातील काळे मणी वाईट शक्ती आणि दुर्दैवापासून संरक्षण करतात, असे मानले जाते. त्यामुळे लग्न झालेल्या महिलेच्या गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असतेच.

मंगळसूत्रात असलेल्या सोन्याच्या वाट्या समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. यामुळे शारीरिक आरोग्य कायमच निरोगी राहते.

नव्या नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यास शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच विवाहित महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात.

लग्नाच्या दिवशी पती पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. हे मंगळसूत्र प्रेम आणि भागीदारीचे प्रतीक आहे. याशिवाय मंगळसूत्रात असलेल्या दोन वाट्या पती आणि पत्नीच्या कुटुंबाच्या एकत्र येण्याचे प्रतीक मानले जाते.






