
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारेंची एन्ट्री (Photo Credit- X)
अण्णा हजारे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनानुसार, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी स्मारकासमोर ते मौन आंदोलनाला बसणार आहेत. विशेष म्हणजे, दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर आंदोलनाची आठवण म्हणून अण्णा हजारे जिथे आंदोलन करणार आहेत, त्या जागेला प्रतिकात्मक “नगरचे जंतर-मंतर” असे नाव देण्यात येणार आहे. अण्णांच्या या अचानक झालेल्या एंट्रीमुळे केंद्र सरकारवरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि लाखो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर सोमवारी झालेल्या लाठीमारानंतर या आंदोलनाचा भडका उडाला असून संपूर्ण देशभरातून तरुणांना पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे, तसेच उद्धव ठाकरे यांनी जंतर-मंतरवर प्रत्यक्ष जाऊन आंदोलक नेते अभिजीत दिपके यांची भेट घेतली. शरद पवार यांनीही जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. राहुल गांधी यांनी आंदोलन करत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.
काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधी लोकपाल विधेयकासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ऐतिहासिक आंदोलन करून अण्णा हजारे यांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अण्णा हजारे कोणत्याही मोठ्या राजकीय किंवा सामाजिक आंदोलनाच्या व्यासपीठावर दिसले नव्हते. आता थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याने या ‘मौन आंदोलनाकडे’ संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील घटनेचा तीव्र निषेध करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “संसद परिसरात शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या निष्पाप तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. सरकारची ही दडपशाही अत्यंत संतापजनक आहे. या अन्यायाविरुद्ध आणि पीडित विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी राज्यव्यापी बंदचे आयोजन केले आहे.” ते पुढे म्हणाले, “मी राज्यातील सर्व समविचारी राजकीय पक्ष, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आग्रहाची विनंती करतो की, त्यांनी या अत्याचाराविरोधात एकत्र यावे आणि २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पूर्ण ताकदीने पाठिंबा द्यावा.”