भाजप प्रदेशाध्यक्षांकडून वडेट्टीवारांचे कौतुक (File Photo)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार, अशी घोषणा केली. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सहा महिन्यांचे वेतन देण्याची घोषणा करून स्वतःच्या पक्षातील आमदारांचेच नव्हे तर सत्ताधारी आमदारांचेही टेन्शन वाढवले आहे. यावरून आता राजकारण होण्याची शक्यता असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमातून वडेट्टीवारांचे अभिनंदन केले. मात्र, सर्वच आमदार त्यांच्यासारखे गडगंज नसतात, अशी टिप्पणीही केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने बांधावर गेले. पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अशा प्रसंगात सर्वच जण आपआपल्या परीने मदत करतात. परिस्थिती गंभीर आणि नाजूक आहे. ती हाताळताना सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे. उलटसुलट वक्तव्य करणे सर्वांनीच टाळले पाहिजे. राजकारण आणि कुरघोडी करण्याची ही वेळ नाही, अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या.
हेदेखील वाचा : Anjali Damania On Nitin Gadkari Fraud : अंजली दमानियांचा नितीन गडकरींवर पहिलाच मोठा आरोप; प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात..”
दरम्यान, वडेट्टीवारांनी सहा महिन्यांचे वेतन द्यायचे ठरवले असले तरी त्यावर आपत्ती घेण्याचे कारण नाही. मात्र, हे करताना सर्वच आमदार वा लोकप्रतिनिधी गडगंज नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्यावे, याकडेही रवींद्र चव्हाण यांनी लक्ष वेधले.
ग्रामीण भागातील आमदारांना सातत्याने फिरावे लागते
वडेट्टीवारांच्या घोषणेवर रवींद्र चव्हाण म्हणाले, त्यांनी सहा महिन्यांचे वेतन द्यायचे ठरवले. त्याबद्दल वडेट्टीवारांचे अभिनंदन. मात्र, लोकप्रतिनिधींना प्रवास भत्त्यासाठी वेतन मिळत असते. ग्रामीण भागातील आमदारांना सातत्याने फिरावे लागते. वडेट्टीवार यांची भावना चांगली असली तर अशा प्रसंगी राजकारण करणे योग्य नाही.
काही लोकप्रतिनिधी प्रचंड गडगंज
काही लोकप्रतिनिधी प्रचंड गडगंज असतात, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना प्रवास भत्ता अपुरा पडतो. त्यांना इतर कामांसाठी स्वतः व्यवस्था करावी लागते. राज्यातील नैसर्गिक संकट मोठे आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना सरकार मदत देणारच आहे. यात काही शंका नाही, असे ते म्हणाले.