‘देवेंद्र फडणवीस राम तर नितेश राणे हनुमान’; जैन मुनी निलेशचंद्र यांचा संदीप देशपांडेंवर पलटवार
मुंबईतील रस्त्यांवर आणि सोसायट्यांमध्ये काढल्या जाणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून निलेशचंद्र मुनी यांनी पुन्हा एकदा देशपांडेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्याबाबतही मोठे विधान केले.
जैन मुनींच्या स्वागतासाठी काही भागांत रस्त्यांवर आणि सोसायट्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या काढल्या जातात. मात्र या पट्ट्यांवर मनसेकडून आक्षेप घेतला जात असून अनेक ठिकाणी या पट्ट्यांवर काळा किंवा इतर रंग टाकण्यात आल्याने वाद अधिक वाढला आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना निलेशचंद्र मुनी यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका केली. “संदीप देशपांडेंनी पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग टाकला, त्यामुळे शनिदेव त्यांच्या कुंडलीत बसला आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच पर्यावरण आणि वृक्षारोपणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. “तुम्ही झाडे लावण्याबाबत बोलता, पण सर्वाधिक वृक्षारोपणाचा विक्रम जैन समाजाने केला आहे. दरवर्षी सर्वाधिक झाडे आम्हीच लावतो,” असेही ते म्हणाले.
यावेळी नितेश राणे यांच्यावर होत असलेल्या टीकेलाही निलेशचंद्र मुनी यांनी उत्तर दिले. “काही लोक नितेश राणेंना हिरवा म्हणत टीका करतात. पण त्यांच्या रक्तात भगवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांना लाभले आहेत. जिथे हिरवा दिसेल तिथे भगवा करण्याची ताकद त्यांच्यात आहे,” असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना प्रभू रामचंद्रांशी करत, “देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस हे राम आहेत, तर नितेश राणे हे त्यांचे हनुमान आहेत,” असे विधान केले.
दरम्यान, संदीप देशपांडे आणि निलेशचंद्र मुनी यांच्यातील वाद नवीन नाही. याआधीही दोघांनी एकमेकांवर थेट टीका केली होती. “निलेशचंद्र मुनी कोणत्या शाळेत शिकले आहेत, हे मला जाणून घ्यायचे आहे,” असे म्हणत संदीप देशपांडेंनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना निलेशचंद्र मुनी यांनी, “तुम्ही मला बोलवा, मग मी माझे शिक्षण काय आहे ते सांगतो,” असा पलटवार केला होता. पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता सामाजिक आणि राजकीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला असून पुढील काही दिवसांत या प्रकरणावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






