स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा
हिंगणघाट : राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी एकत्र लढावे लागेल. या लढ्यात सर्वसामान्यांची साथही आता आवश्यक झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केले.
स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाट येथे राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात सोमवारी, २४ रोजी मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाच्या अनुषंगाने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे, माजी आमदार भुसारा, अनिल जवादे, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे, विनोद वानखेडे, अमोल बोरकर, नगरसेविका शीतल बोरकर, लोणकर, महेश झोटिंग, शुभांगी डोंगरे, सुनील पिंपळकर, मोहम्मद रफीक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रोहित पवार पुढे म्हणाले, राज्यात स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लुटमार सुरू आहे. हे स्मार्ट मीटर आधी शासकीय कार्यालयात लावू, ही चाचणी यशस्वी झाल्यावर ५ वर्षानंतर सर्वसामान्यांच्या घरी लावू, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र, आता जबरदस्तीने हे मीटर सर्वसामान्यांच्या घरी लावण्याची मोहीम सुरू आहे. स्मार्ट मीटर लावण्यासाठी २७ हजार कोटी रुपयांचे लक्ष्य आहे. भ्रष्टाचारासाठी सत्ताधाऱ्यांनी हे भूत उभे केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, भरमसाठ वाढलेले खताचे भाव यावरही त्यांनी टीका केली. राज्य सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यावर आपण आंदोलन केले. त्याचा फायदा आता ५५ लाख शेतकऱ्यांना होईल, असा दावाही त्यांनी याप्रसंगी केला.
शक्तिपीठ मार्गाच्या माध्यमातून ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केले. विशेष म्हणजे रोहित पवार व शशिकांत शिंदे यांचा हिंगणघाट शहरात प्रवेश होत असताना कारंजा चौक येथे सत्ताधारी नगरसेवकांकडून काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. हे लक्षात येताच पोलिसांनी संबंधित नगरसेवकांना ताब्यात घेतले.
स्मार्ट मीटरविरोधात महाराष्ट्रातील हा पहिला ऐतिहासिक व प्रचंड मोर्चा असल्याचे यावेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले. भर पावसात शरद पवार यांनी सभेला संबोधित केले होते, तर आजही पावसाला न जुमानता हिंगणघाट येथे मोर्चा झाला. पाऊस पडतो तेव्हा क्रांती होते, येथेही क्रांती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला, सुलतानपूर येथील पुलासाठी एक महिन्याची मुदत आपण प्रशासनाला देत असून त्यानंतर आपण स्वतः येथे येऊ व अधिकाऱ्याना धडा शिकवू असा निर्वाणीचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.






