
वंचित बहुजन आघाडीचा 'या' दिवशी महाराष्ट्र बंद'ची हाक, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन (Photo Credit- X)
दिल्लीतील घटनेचा तीव्र निषेध करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “संसद परिसरात शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या निष्पाप तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. सरकारची ही दडपशाही अत्यंत संतापजनक आहे. या अन्यायाविरुद्ध आणि पीडित विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी राज्यव्यापी बंदचे आयोजन केले आहे.” ते पुढे म्हणाले, “मी राज्यातील सर्व समविचारी राजकीय पक्ष, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आग्रहाची विनंती करतो की, त्यांनी या अत्याचाराविरोधात एकत्र यावे आणि २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पूर्ण ताकदीने पाठिंबा द्यावा.”
काल दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मी सर्व… https://t.co/5MHwdJGn14 — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 21, 2026
दरम्यान, संजय राऊत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी)च्या आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.” शिवाजी पार्कवरील सभा, तसेच पुणे आणि नागपूरमधील युवकांचा प्रतिसाद पाहता देशभरात या आंदोलनाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारला इशारा देताना राऊत म्हणाले, “जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या वेळ पडली तर आम्हीही इथे येऊन बसू. आम्ही जेलला किंवा गोळ्यांना घाबरत नाही. देशासाठी प्राण देणाऱ्यांमध्ये आम्हीही आहोत.” दिल्लीतील पोलिस कारवाईवर टीका करत त्यांनी ती घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याचा आरोप केला.