
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटात बंडाचे पडसाद; भाजपला साथ देणाऱ्या तीन आमदारांवर मोठी कारवाई
राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सोलापूर विधान परिषद निवडणुकीत केवळ महायुती आणि महाविकास आघाडीतील लढतच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील अंतर्गत मतभेदही उघडपणे समोर येत आहेत. पक्षाच्या चार आमदारांपैकी तीन आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवल्याने राजकीय वातावरण तापले असून, या आमदारांविरोधात कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना, निवडणुकीनंतर पक्षाची बैठक होईल आणि त्यामध्ये बंडखोर आमदारांबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून राजेंद्र राऊत तर महाविकास आघाडीकडून वसंतराव देशमुख रिंगणात आहेत. सुरुवातीला ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. मात्र काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली. या प्रक्रियेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रचारादरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी “आमच्याकडे 600 अदृश्य मतं आहेत” असा दावा करत निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. मात्र प्रत्यक्षात पक्षातील काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांची राजकीय लढाई अधिक कठीण झाल्याचे चित्र दिसत आहे.
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि आमदार नारायण पाटील यांनी उघडपणे भाजप समर्थित उमेदवाराच्या बाजूने भूमिका घेतल्याची चर्चा आहे. यामागे स्थानिक राजकारणातील नाराजी आणि काही प्रलंबित वाद कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
मोठी बातमी ! वळसे पाटलांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; भेटीचं कारण आलं समोर
उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर हे देखील या निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तर आमदार अभिजीत पाटील यांनी पंचायत समिती निवडणुकीतील घडामोडींवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. वसंतराव देशमुख यांनी यापूर्वी भाजपला मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला.
मात्र पक्षातील मतभेद सार्वजनिकपणे मांडणे किंवा विरोधी पक्षासोबत जाऊन पाठिंबा जाहीर करणे योग्य नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. पक्षाने सर्व आमदारांना अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या कारवाईबाबत कोणतीही घाई न करता निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा केली जाणार आहे. मात्र निकालानंतर होणाऱ्या बैठकीत पक्षशिस्त, आमदारांची भूमिका आणि पुढील राजकीय दिशा यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सोलापूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल जितका महत्त्वाचा ठरणार आहे, तितकीच उत्सुकता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आपल्या बंडखोर आमदारांबाबत कोणती भूमिका घेणार याबाबतही निर्माण झाली आहे.
Operation Tigerच्या चर्चांदरम्यान ‘मातोश्री’वर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक; कोण उपस्थित, कोण गैरहजर?