
ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर (Photo Credit - X)
माध्यमांशी बोलताना अमेय घोले यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “ठाकरे गटात सध्या लोकप्रतिनिधींची गळचेपी होत आहे. पक्षातील खासदार आणि आमदारांना नेतृत्वाकडून भेटण्यासाठी पुरेसा वेळ आणि महत्त्व दिले जात नाही. याच मुख्य कारणास्तव लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी असून पक्षांतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे.”
“पक्षनेतृत्वाच्या अनास्थेला कंटाळून ठाकरे गटातील अनेक आमदार आणि खासदार आता उघडपणे ‘आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचेच नेतृत्व हवे आहे’, अशी भूमिका मांडत आहेत,” असा दावा घोले यांनी केला. यापूर्वी ज्याप्रमाणे काही प्रमुख खासदार आणि माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला, तीच पुनरावृत्ती आता उर्वरित नगरसेवकांच्या बाबतीतही पाहायला मिळणार असून ठाकरे गटाला आगामी काळात मोठ्या गळतीचा सामना करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्हीप म्हणजे नेमके काय? कधी लागू होतो आणि त्याचे उल्लंघन केल्यास काय होते? जाणून घ्या नियम
घोले यांनी या बंडाची सुरुवात कुठून होणार याचे संकेतही दिले. “सातारा जिल्ह्यातील सुमारे २० ते २५ नगरसेवक सध्या आमच्या थेट संपर्कात असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत. हे नगरसेवक लवकरच आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करतील,” असे सांगत त्यांनी साताऱ्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट केले.
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना घोले म्हणाले की, “शिवसेना हा परंपरेने आणि विचाराने नेहमीच काँग्रेसविरोधी पक्ष राहिला आहे. मात्र, सध्याचा ठाकरे गट आपल्या मूळ विचारांपासून भरकटला असून तो थेट काँग्रेसला मदत करत आहे. ही तडजोड कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मान्य नाही. त्यामुळे संजय राऊतांनी रोज उठून दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा, पक्ष का रसातळाला जात आहे याचे आधी आत्मपरीक्षण करावे.” राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता ठाकरे गटातील नाराजी उफाळून आली असून, आगामी काळात अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा विश्वास शेवटी अमेय घोले यांनी व्यक्त केला.