फोटो सौजन्य- pinterest
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल नागाव परिसर बोलला की, पर्यटन, समुद्रात जाऊन मौजमजा करणे माहिती आहे पण याभागात अत्यंत सुंदर असे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात अनेक चित्रपट, मालिका यांच्या शुटींग झाल्या आहेत. असे नारळी-पोफळीच्या बागांमध्ये कोणते मंदिर आहे, हे जाणून घेऊया
कोकणात अनेक सुंदर शिव मंदिरे आहेत. त्यापैकी अतिशय अप्रतिम रचना असलेले आणि ऐतिहासिक वारसा असलेले एक मंदिर म्हणजे चौल गावचा रामेश्वर. समोर दीपमाळ, तलाव असे चौलमध्ये एक भव्य शिवमंदिर आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रेवदंडा मार्गावर चौल येथे असलेले रामेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि जागृत शिवस्थान आहे, जे चौलचे ग्रामदैवत मानले जाते. नारळी-पोफळीच्या बागांमध्ये वसलेले हे मंदिर कोकणी शैलीतील असून, येथील दगडी आणि नंदी मंडप मुख्य आकर्षण आहेत. हे मंदिर ऐतिहासिक कान्होजी आंग्रे यांनी बांधल्याचे मानले जाते.
इथे तलावाकडे पाठ करून आणि गर्भगृहाकडे नजर वळवलेल्या स्थितीत दक्षिणी पद्धतीचा नंदी आहे. भाविक इथे आल्यावर प्रथम हातपाय धुतात आणि नंतर नंदीला डोके आणि हात टेकून नमस्कार करतात. त्यानंतर काही मंदिरात जातात तर काही प्रथम प्रदक्षिणा घालून मग मंदिरात जातात. इथल्या देवांना, नंदीला आणि तुळशीला ते फळे आणि भात अर्पण करतात.
चौलच्या रामेश्वर मंदिरात सोमवारी, महाशिवरात्री, प्रदोष व्रत आणि श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरात त्रिपुरा पौर्णिमेला दीव्यांची आरास केली जाते. याचे दर्शन घेण्यासाठी ही भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
मंदिरासमोरील दगडी तलावाबद्दलही बरीच माहिती उपलब्ध आहे. इसवी सन १८३८ मध्ये या पुष्करिणीच्या दुरुस्तीसाठी ७५० रुपये खर्च ग्रामस्थांनी मिळून केला. नंदीजवळ असलेली दीपमाळ लाडो भावजी प्रभू पाताणे यांनी १७८४ मध्ये बांधली तर तलावाजवळ असलेली दीपमाळ बाबाजी लोहार यांनी बांधली. मंदिरात अतिशय सुबक आणि रेखीव गणेशमूर्तीही पाहता येते.
या मंदिराचा जीर्णोद्धार ८ ऑक्टोबर १७४१ रोजी श्रीनिवास बाबा दीक्षित यांनीविजयादशमीच्या मुहूर्तावर करवून घेतला. यासतीच मानाजी आंगरे आणि नानासाहेब पेशव्याचे आर्थिक अनुदान मिळाले. पुढे उरलेली रंगरंगोटी आणि दीपमाळा, तुळशी वृंदावन वगैरे काम विसाजीपंत सरसुभेदार यांनी १७६९-७० मध्ये पूर्ण करून घेतले. या मंदिराला अर्धा खंडी भात नेमला गेला होता. धार्मिक प्रवृत्तीच्या राघोजी आंगरेंनी यात अजून अर्ध्या खंडी भाताची भर घातली.
या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे इथे तीन कुंडं आहेत. अग्निकुंड, वायूकुंड आणि पर्जन्यकुंड. जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा पर्जन्य कुंड उघडले जाते आणि देवाला पाऊस पडावा म्हणून धावा केला जातो. १८७६ साली जेव्हा पर्जन्य कुंड उघडले तेव्हा आत काही नाणी सापडली ती पूजेसाठी ठेवण्यात आली. मंदिराबाहेर एका मंचावर नवग्रहांची मांडणी केलेली दिसते त्यांचीही नित्य पूजा केली जाते.
अनेक पेशवेकालीन मंदिरांचे खास वैशिष्ट्य म्हणजे देवतांच्या संगमरवरी मूर्ती. रामेश्वर मंदिरात श्री विष्णूची अतिशय सुबक संगमरवरी मूर्ती पाहायला मिळते.
या मंदिरात जाण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरून लॉंच पकडून समुद्र सफारी करत अलिबागला जाता येते. तेथून रिक्षा किंवा टमटमने चौल येथील रामेश्वर मंदिरात पोहोचता येते. पण पावसाळ्यात लॉंच बंद असते. अशावेळी एसटी बसने अलिबाग किंवा मुरूड गाडी पकडून अगदी मंदिराजवळ पोहोचता येते. पावसाळ्यात मंदिरासमोरील तलावात पोहोता येते. असा वेगळा आनंद ही प्राप्त करता येतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कोकणातील मंदिरे निसर्गाच्या सान्निध्यात—नारळी, पोफळीच्या बागांमध्ये वसलेली असतात. त्यामुळे येथे शांतता, प्रसन्नता आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते.
Ans: हे एक प्राचीन शिवमंदिर असून चौल गावाचे ग्रामदैवत मानले जाते. येथे भक्तांना श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
Ans: मंदिर कोकणी शैलीत बांधलेले आहे. दगडी बांधकाम, नंदी मंडप, दीपमाळ आणि समोरील तलाव (पुष्करिणी) ही याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.






