वास्तुदोष म्हणजे नेमकं काय ?
वास्तुदोष म्हणजे घरातील पाच तत्त्वे (भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) आणि ऊर्जा यांच्यात निर्माण झालेले असंतुलन होय. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार घराची रचना नसेल, तर नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याला वास्तुदोष म्हणतात. घर किंवा ऑफिसमधील वास्तूच्या रचनांमध्ये त्रुटी असल्याने होणारा नकारात्मक ऊर्जा प्रवाह. म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार घर, दुकान, ऑफिस किंवा इमारत बांधताना दिशा, रचना, खोलींची मांडणी, दरवाजे-खिडक्या, स्वयंपाकघर, पूजा खोली, शौचालय इत्यादी गोष्टी योग्य नसतील, तर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला वास्तुदोष असे म्हणतात.
वास्तुदोष कसा ओळखायचा ?
वास्तुदोषाचा परिणाम माणसाच्या दैनंदिन जीवनावर अप्रत्यक्षपणे होतो, असे मानले जाते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना मानसिक तणाव, चिडचिड, झोप न लागणे, सतत आजारपण किंवा नातेसंबंधांमध्ये तणाव जाणवू शकतो. आर्थिक अडचणी, कामात अडथळे येणे, प्रगती खुंटणे यासारख्या समस्या देखील वास्तुदोषाशी जोडल्या जातात. त्यामुळे अनेकजण घर बांधताना किंवा खरेदी करताना वास्तुशास्त्राचा सल्ला घेतात.
वास्तुदोष कसा होतो?
चुकीची दिशा, फर्निचरची मांडणी, सूर्यप्रकाशाचा अभाव, घाण आणि तुटलेल्या वस्तू हे दोष निर्माण होण्याची मुख्य कारणे आहेत. घरातील विविध भागांची दिशा योग्य असणे वास्तुशास्त्रात महत्त्वाचे मानले जाते. जसं की, मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला असणे, स्वयंपाकघर आणि शौचालय समोरासमोर असणे, घराच्या मध्यभागी जड वस्तू किंवा शौचालय असणे, आग्नेय दिशेला पाण्याची टाकी असणे किंवा नैऋत्य दिशेला स्वयंपाकघर असणं ही सर्व वास्तुदोषाची सामान्य उदाहरणं मानली जातात. अशा रचनांमुळे घरातील ऊर्जेचा प्रवाह बिघडतो आणि नकारत्मक ऊर्जेचा वावर जास्त वाढतो. प्रत्येक घर हे वास्तुशास्त्रानुसार बांधलेले असेलच असे नाही. त्यामुळे वास्तुदोष आढळल्यास घाबरण्याची गरज नसते. स्वच्छता राखणे, घरात प्रकाश व हवा खेळती ठेवणे, सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि काही सोपे वास्तु उपाय केल्यास वास्तुदोषाचे परिणाम कमी होऊ शकतात, असे वास्तुशास्त्र मानते. शेवटी, शांतता, समाधान आणि सकारात्मकता हीच कोणत्याही घराची खरी ऊर्जा असते.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






