Shardiya Navratri: 'याच' पर्वतावर देवी भवानीने केला होता महिषासुराचा वध; आजही केली जाते 'या' ठिकाणी त्या राक्षसाची पूजा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
सप्तशृंगी पर्वतावर देवी भवानीने महिषासुर राक्षसाचा वध केला अशी पुराणकथा सांगितली जाते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच मंदिराजवळ महिषासुराच्या कापलेल्या डोक्याची देखील पूजा केली जाते.
महाराष्ट्रातील नाशिकजवळील सप्तशृंगी देवीचे हे अर्धशक्तीपीठ भाविकांसाठी अद्भुत श्रद्धास्थान मानले जाते.
महिषासुराच्या वधाची आणि पूजेची गूढ कहाणी : आपण अनेकदा देवी दुर्गेच्या पराक्रमाच्या कथा ऐकतो ज्या ठिकाणी देवीने राक्षसांचा संहार केला त्या स्थळांवर आजही मंदिरे उभी आहेत. पण नाशिकजवळील सप्तशृंगी पर्वतावरील कथा मात्र थोडी विलक्षण आहे. कारण येथे देवी भवानीने महिषासुराचा वध केला, तरीही त्याच राक्षसाच्या कापलेल्या डोक्याची पूजा आजही केली जाते. हे ऐकून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो ज्या राक्षसाने देवांना आणि लोकांना त्रास दिला, त्याची पूजा का? चला तर मग या रहस्यमय पर्वताची कथा, त्यातील इतिहास आणि श्रद्धेचे अद्भुत स्वरूप समजून घेऊया.
नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळील सप्तशृंगी पर्वतावर ४,८०० फूट उंचीवर देवी भवानीचे मंदिर आहे. सात डोंगरांच्या कुशीत वसलेले हे स्थान म्हणूनच “सप्तशृंगी” नावाने ओळखले जाते. भारतातील १०८ शक्तीपीठांपैकी हे एक अर्धशक्तीपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी सप्तशृंगी देवीचे स्थान विशेष पूजनीय आहे. मंदिर गाठण्यासाठी भक्तांना तब्बल ४७२ पायऱ्या चढाव्या लागतात. डोंगरावर १०८ नैसर्गिक पाण्याची टाकी आहेत, तर गुहेसारख्या गाभाऱ्यातून तीन प्रवेशद्वारांमधून देवीची दिव्य मूर्ती दिसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh News : बांगलादेशात पुन्हा हिंदू अल्पसंख्यांना लक्ष्य; दुर्गापूजेपूर्वी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड
नवरात्रात या मंदिराचा सोहळा थाटामाटात साजरा होतो. चैत्र नवरात्रात देवी आनंदी स्वरूपात भाविकांना दर्शन देते, तर आश्विन नवरात्रात तिचा चेहरा अत्यंत गंभीर दिसतो. हा बदल भक्तांना आश्चर्यचकित करतो, पण त्यातूनच आईच्या करुणा आणि रौद्र या दोन रूपांचे दर्शन घडते.
दुर्गा सप्तशतीनुसार, महिषासुराचा अहंकार आणि अत्याचार असह्य झाल्यावर देवतांनी देवीला आवाहन केले. प्रत्येक देवाने आपली दिव्य शस्त्रे तिला अर्पण केली – शंकरांनी त्रिशूळ, विष्णूंनी चक्र, इंद्राने वज्र आणि घंटा, यमाने काठी, तर हिमालयाने सिंह हे वाहन दिले. या शक्तींनी संपन्न झालेली सप्तशृंगी देवी अठरा हातांनी शस्त्रधारी स्वरूपात महिषासुराशी लढली आणि याच पर्वतावर त्याचा वध केला.
युद्धात महिषासुराचा अंत झाला, परंतु त्याचे कापलेले डोके पर्वताजवळ ठेवण्यात आले. आश्चर्य म्हणजे आजही तेथे एक छोटे मंदिर आहे जिथे त्याच्या डोक्याची पूजा केली जाते. यामागे एक गूढ श्रद्धा आहे जरी तो राक्षस होता, तरी त्याच्यामुळेच देवीचे पराक्रमी रूप प्रकट झाले. काही लोक मानतात की महिषासुराने शेवटी मृत्यूपूर्वी देवीसमोर आत्मसमर्पण केले होते. म्हणूनच त्याच्या स्मृतीचा मान राखून त्याचे पूजन केले जाते. यालाच “विरोधकाचेही स्मरण, पण देवीच्या महिम्याची जाणीव ठेवून” असे म्हणतात.
सप्तशृंगी पर्वताभोवती अनेक लोककथा प्रचलित आहेत. स्थानिक लोक सांगतात की देवीच्या त्रिशूळाच्या प्रहारामुळे पर्वतात एक छिद्र पडले आणि ते आजही पाहायला मिळते. भाविक या छिद्राला दैवी शक्तीचे प्रतिक मानतात. म्हणूनच येथे येणारे भाविक प्रथम देवीचे दर्शन घेतात आणि नंतर महिषासुराच्या डोक्यालाही नमस्कार करतात. या पूजेतून एक तत्त्व शिकवले जाते सत्य-असत्याच्या लढाईत जेव्हा असत्याचा अंत होतो, तेव्हा त्यालाही मान दिला जातो, कारण त्यातूनच सत्य अधिक तेजस्वी होते.
हे देखील वाचा : Shardiya Navratri: नवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजांनाना द्या या भक्तिमय शुभेच्छा
सप्तशृंगी हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे केंद्र आहे. नवरात्र, दत्तजयंती किंवा चैत्रपालवीच्या काळात लाखो भाविक येथे येतात. गाभाऱ्यात देवीचे रूप पाहताना भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. पर्वताच्या कुशीत असलेले शांत वातावरण भक्तीची अनुभूती अधिक गहिरं करतं. सप्तशृंगी पर्वत आपल्याला केवळ धार्मिक परंपरेचेच नव्हे, तर जीवनातील गहन तत्त्वांचे धडे देतो. येथे देवीच्या पराक्रमाची गाथा ऐकताना भक्त धैर्य, शक्ती आणि श्रद्धेचा अनुभव घेतात. त्याचवेळी महिषासुराच्या डोक्याची पूजा करताना एक वेगळा दृष्टिकोन उमजतो विरोधकाचीही आठवण ठेवली पाहिजे, कारण त्याच्या अस्तित्वामुळेच चांगुलपणाचे तेज अधोरेखित होते. सप्तशृंगीची ही कथा आपल्याला सांगते की आई कधी गंभीर तर कधी आनंदी असते, पण शेवटी ती सदैव आपल्या संततीच्या रक्षणासाठी सज्ज असते.