Urban farming
सुनयना सोनवणे
कुंड्या, पिशव्या आणि छोट्या वाफ्यांमध्ये टोमॅटो, मिरची, पालक, मेथी, कोथिंबीर, वांगी यांसारख्या भाज्या घेतल्या जात आहेत. काही नागरिक मातीविना शेती आणि उभ्या पद्धतीने लागवडीचे प्रयोगही करीत आहेत. कमी जागेत अधिक लागवड करण्यासाठी या पद्धती उपयुक्त ठरत आहेत.
शहरी शेतीची विशेष बाब म्हणजे यात घरातील ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर होतो. भाजीपाल्याच्या साली, फळांचे अवशेष आणि चहाचा चोथा यापासून कंपोस्ट तयार करून त्याचा वापर झाडांसाठी केला जातो. त्यामुळे कचरा – खत – शेती – अन्न अशी छोटी साखळी तयार होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा छंद आणि समाधानाचा स्रोत ठरत असून, मुलांनाही शेतीची प्रत्यक्ष ओळख होत आहे.
शहरी शेतीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळेलच असे नाही; मात्र घरच्या वापरातील काही भाजीपाला पिकवल्याने खरेदीचा खर्च कमी होतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे कचरा कमी करणे, हिरवाई वाढविणे आणि नागरिकांना निसर्गाशी जोडणे हे या प्रयोगाचे मोठे फायदे आहेत.
शहरी शेती करणारे स्थानिक नागरिक नागेश पाटील म्हणाले की, ‘आम्ही काही कुंड्यांपासून सुरुवात केली. आता घरच्या वापरासाठी मिरची, कोथिंबीर, मेथी पिकवतो. स्वतः पिकविलेली भाजी ताटात येण्याचा आनंद वेगळाच आहे . ओला कचरा कमी करण्यासाठी कंपोस्ट सुरू केले. त्यातून तयार झालेले खत सोसायटीच्या बागेसाठीही वापरतो. आता रहिवाशांचा सहभागही वाढत आहे.’
ज्येष्ठ नागरिक, उषा सावंत म्हणाले की ‘गावाकडची शेती शहरात स्थायिक झाल्यानंतर मागे राहिली होती. गच्चीवरील झाडांमुळे पुन्हा मातीशी जोडले गेल्यासारखे वाटते आणि सोबतच विरंगुळाही मिळतो.
कृषी अभ्यासक, डॉ. उत्कर्ष गायकवाड म्हणाले की, ‘कमी जागेत शेती शक्य आहे; मात्र गच्चीची क्षमता, पाण्याचा वापर, योग्य पिकांची निवड आणि पोषकद्रव्यांचे व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’






