Team India (Photo Credit- X)
आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) साठीच्या भारतीय संघाबाबत रोज नवीन बातम्या येत आहेत. आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार, युवा फलंदाज शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांना या स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ चा अंतिम सामना २८ सप्टेंबरला खेळला जाईल. यावेळी ही स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये होणार असून, टीम इंडिया आपला पहिला सामना १० सप्टेंबरला खेळेल. स्पर्धेचे आयोजन युएईमधील अबू धाबी आणि दुबई येथे होणार आहे. मात्र, बीसीसीआयने (BCCI) अद्याप संघाची घोषणा केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टी-20 संघात जास्त बदल करण्याच्या बाजूने नाहीत. त्यामुळे, गेल्या काही काळापासून टी-20 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाच कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. यामुळेच, आयपीएल २०२५ मध्ये चांगली कामगिरी केलेल्या गिल, जयस्वाल, सुदर्शन आणि अय्यर यांना संघात स्थान मिळणे कठीण आहे.
आशिया कप २०२५ मध्ये सलामीची जबाबदारी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. सॅमसनने जुलै २०२४ पासून भारतासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या जगातील नंबर-१ फलंदाज आहे. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माचे स्थान निश्चित मानले जात आहे. मध्यक्रमात कर्णधार सूर्यकुमार यादवसह हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे आणि जितेश शर्मा यांच्यावर विश्वास दाखवला जाऊ शकतो.
फिरकी विभागात वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संधी मिळू शकते. तसेच वेगवान गोलंदाजीत हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांचा संघात समावेश होऊ शकतो.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह.