शाहबाज शरीफ यांचा भारतविरोधी हल्लाबोल: सिंधू पाणी करार रद्द केल्यामुळे अझरबैजानमध्ये विष ओकले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Shahbaz Sharif Azerbaijan speech : भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अझरबैजानमध्ये झालेल्या आर्थिक सहकार्य संघटना (ECO) शिखर परिषदेत भारताविरुद्ध उघडपणे विष ओकले. त्यांनी भारतावर ‘पाण्याचे शस्त्रीकरण’ केल्याचा आरोप करत, भारत युद्धपातळीवर वागतोय, असे वक्तव्य केले. शाहबाज शरीफ यांच्या भाषणावेळी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान देखील उपस्थित होते. शाहबाज यांच्या या उग्र वक्तव्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान ईसीओ शिखर परिषदेला संबोधित करताना म्हणाले, “भारताची कृती म्हणजे सिंधू पाणी कराराचे पूर्ण उल्लंघन आहे. सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानच्या २४ कोटी जनतेसाठी जीवनरेषा आहे. त्याचे शस्त्रीकरण करणे ही युद्धासारखी कृती आहे.” शाहबाज शरीफ यांच्या या प्रतिक्रियेचा संदर्भ २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या निर्णयाशी आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता, त्यात अनेक पर्यटक होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? चीनमध्ये सत्ता बदलाची जोरदार चर्चा, ‘हे’ 5 दावेदार सर्वाधिक चर्चेत
शाहबाज यांनी परिषदेत बोलताना म्हटले की, “भारताला या धोकादायक मार्गावर चालू देणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची गंभीर चूक ठरेल. भारताची ही कृती पाकिस्तानच्या जनतेविरोधात युद्धासारखीच आहे.”
त्यांनी हेही नमूद केले की, सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाकिस्तानच्या कृषी, उद्योग, वीज उत्पादन आणि दैनंदिन जीवनावर भारताच्या निर्णयाचा थेट परिणाम होतो.
शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत झालेल्या अलिकडच्या लष्करी संघर्षाचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, “भारताचा पाकिस्तानवरील हल्ला हा प्रादेशिक शांतता अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे.” त्यांनी भारताच्या धोरणांचा उल्लेख करत हे सूचित केले की, भारत शांतता आणि सहजीवनाच्या मार्गावर नसून संघर्ष भडकवण्याच्या धोरणावर आहे.
परिषदेच्या दरम्यान शाहबाज शरीफ यांनी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव यांची भेट घेतली. भारताविरोधातील संघर्षात अझरबैजानने दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी आभार मानले. त्यांनी यावेळी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचीही भेट घेतली, ज्यांना पाकमध्ये ‘खलिफा’ म्हणून पाहिले जाते. शाहबाज यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांसमोर भारताच्या कथित आक्रमकतेबद्दल चिंता व्यक्त करत, मुस्लिम देशांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘दलाई लामांचा नाही तर माओचा पुनर्जन्म शोधा’; तिबेटी निर्वासित सरकारचा चीनवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, भारत सरकारने या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, राजनैतिक वर्तुळात या वक्तव्यांकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत पाकिस्तानच्या पाणीवाटप धोरणात केलेल्या हस्तक्षेपाचा पुन्हा आढावा घेत आहे.
शाहबाज शरीफ यांचे अझरबैजानमधील भाषण हे केवळ भारताविरोधी राजकारणापुरते मर्यादित नसून, पाकिस्तानच्या अंतर्गत दबावाचेही प्रतिबिंब आहे. भारताच्या सिंधू पाणी करार रद्दीकरणाचा प्रभाव केवळ कागदावर नाही, तर तो पाकिस्तानच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेवरही गंभीर परिणाम करू शकतो. या घडामोडीमुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणावाची लाट उसळली असून, प्रादेशिक शांततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढील मध्यस्थीची शक्यता निर्माण झाली आहे.