काय आहे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या 'Budget' चे महत्त्व? वाचा सविस्तर (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
नवी दिल्ली: भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प केवळ देशासाठीच महत्त्वाचा नसून, त्याचा प्रभाव जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडतो. भारत हा सर्वात वेगाने वाढणारा प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, त्यामुळे त्याच्या आर्थिक धोरणांचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर दिसून येतात. व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक स्थिरतेवर या अर्थसंकल्पाचा मोठा प्रभाव असतो.
आज आपल्या भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण सलग आठव्यांदा अर्थसंकल्प जाहीर करणारअसून सर्व देशांतील नागरिकांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारमधील हे पहिलेच बजेट असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपासून सर्वांचे लक्ष या बजेटकडे लागले आहे. सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत.
हे आहेत जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्व वाढवणारे घटक
आर्थिक महासत्ता
जागतिक GDP वाढीमध्ये सुमारे 7% वाटा भारताचा असून FY25 मध्ये भारताची नाममात्र GDP $4.2 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि समावेशक विकासासाठी अर्थसंकल्पाद्वारे ठोस उपाययोजना केल्या जातात, ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होतो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन (NIP) अंतर्गत $1.4 ट्रिलियन खर्चाच्या योजनांनी स्टील, सिमेंट आणि तंत्रज्ञानाच्या मागणीत वाढ केली आहे, यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पुरवठादारांना फायदा झाला आहे.
भारताची 1.4 अब्ज लोकसंख्या ही जागतिक बाजारापेठेसाठी मोठी ग्राहकपेठ आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील सादर केलेली धोरणे, करसवलती आणि कल्याणकारी योजनांमुळे देशांतर्गत मागणी वाढते, जी इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि लक्झरी वस्तूंच्या जागतिक निर्यातीला चालना देते.
उदयोन्मुख बाजारातील आघाडी
भारताची आर्थिक वाटचाल उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आघाडीवर आहे. वित्तीय सुधारणा, डिजिटल परिवर्तन आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातून विशेष प्रोत्साहन दिले जाते. यामुळे भारत केवळ आर्थिक विकास साधत नाही तर इतर देशांनाही टिकाऊ विकासाची दिशा दाखवतो. भारताची अर्थव्यवस्था ही इतर विकसनशील देशांसाठी एक मॉडेल ठरत आहे.
जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीचे केंद्र
भारतातील व्यापार स्वातंत्र्य, थेट परकीय गुंतवणूक (FDI) आणि व्यवसाय सुलभतेबाबत घेतलेले निर्णय जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीवर प्रभाव टाकतात.
भू-राजकीय प्रभाव
भारताच्या संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील बजेटचा जागतिक पातळीवर मोठा परिणाम होतो. 2024-25 च्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी ₹6.22 लाख कोटी (सुमारे $75 अब्ज) मंजूर करण्यात आले असून हे GDP च्या 2% आणि सरकारच्या एकूण खर्चाच्या 12.9% आहे.
अमेरिका आणि चीनननंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा लष्करी खर्च करणार देश आहे. यामुळे दक्षिण आशियातील स्थिरता आणि हिंद महासागरातील महत्त्वाच्या व्यापार मार्गांचे संरक्षण यासाठी भारताचे योगदान महत्त्वाचे ठरते.
जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम
भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प हा केवळ देशाचा आर्थिक आराखडा नसून जागतिक स्तरावर परिणाम करणारा महत्त्वाचा आर्थिक दस्तऐवज आहे. व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासावर त्याचा व्यापक प्रभाव आहे. भारताच्या वाढत्या जागतिक भूमिकेमुळे भविष्यातही जगभरातील देश आर्थिक आरोग्याचे मापन करण्यासाठी भारताच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष देतील.