काय आहे 'वदीमा कायदा' आणि UP च्या 'शहजादी'ला दुबईत का झाली फाशीची शिक्षा? जाणून घ्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दुबई : संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) कठोर कायद्यांमुळे उत्तर प्रदेशच्या एका महिलेवर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘वदीमा कायदा’ अंतर्गत बालकाच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यात आलेल्या या महिलेच्या वडिलांनी भारतीय सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
काय आहे वदीमा कायदा?
UAE मध्ये लहान मुलांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेला ‘वदीमा कायदा’ हा 2016 मध्ये अंमलात आला. हा कायदा मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आला असून, तो त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणावर भर देतो. मुलांवरील कोणत्याही प्रकारच्या अत्याचार, शोषण किंवा हिंसेला आळा घालण्यासाठी या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाते. फेडरल लॉ क्रमांक 3 च्या कलम 342 नुसार, एखाद्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे जर मुलाचा मृत्यू झाला, तर संबंधित दोषीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये दीर्घ तुरुंगवास किंवा फाशीच्या शिक्षेचा समावेश होतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अखेर सुरू झाले व्यापार युद्ध! युरोपियन युनियनची अन्न आयातीवर बंदी घालण्याची तयारी, Trump यांना धक्का
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका महिलेवर दुबई न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिचे वडील शब्बीर खान यांच्या मते, ती निर्दोष असून तिला चुकीच्या आरोपात अडकवण्यात आले आहे. शब्बीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानपणी झालेल्या अपघातामुळे त्यांच्या मुलीचा चेहरा जळाला होता. कोविड-19 लॉकडाऊनदरम्यान, ती बांदामधील ‘रोटी बँक’मध्ये काम करत होती. त्याच काळात तिची फेसबुकवर आग्रा येथील उझैर नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली.
नोव्हेंबर 2021 मध्ये उझैरने तिच्या उपचारासाठी दुबईला पाठवले. दुबईत पोहोचल्यावर ती उझैरच्या नातेवाईकांच्या संपर्कात आली. त्यामध्ये उझैरचा काका फैज, काकू नाझिया आणि नाझियाची सासू अंजुम सहाना बेगम यांचा समावेश होता. शब्बीर खान यांच्या म्हणण्यानुसार, नाझियाने एका बाळाला जन्म दिला होता, परंतु केवळ चार महिने आणि 21 दिवसांनंतर त्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शहजादीवर बाळाच्या मृत्यूचा आरोप ठेवण्यात आला आणि तिला अटक करण्यात आली.
फाशीच्या शिक्षेवर भारत सरकारकडून प्रयत्न
शब्बीर खान यांनी वारंवार भारतीय सरकारला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. त्यांचा दावा आहे की, त्यांची मुलगी निर्दोष असून तिला अन्यायकारकपणे शिक्षा ठोठावली जात आहे. भारतीय दूतावासाने या प्रकरणात UAE सरकारशी सातत्याने संपर्क साधला असून, ‘शहजादी’च्या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या न्यायालयात या याचिकेवर सुनावणी सुरू आहे आणि अंतिम निकाल प्रतीक्षेत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्यांना गुन्हेगाराप्रमाणे बेड्या ठोकण्यात आल्या…’ व्हाईट हाऊसने शेअर केला ‘हा’ हृदयद्रावक व्हिडिओ
UAE मधील कठोर कायदे आणि त्याचे परिणाम
UAE मध्ये कायद्यांचे उल्लंघन केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाते. विशेषतः मुलांच्या सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांसाठी येथे अत्यंत गंभीर शिक्षेची तरतूद आहे. वडीमा कायद्यांतर्गत दोषींना कोणतीही सवलत दिली जात नाही. या प्रकरणात भारतीय सरकार कोणती भूमिका घेते आणि शहजादीला न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तिच्या वडिलांनी केलेल्या आर्जीनंतर हा मुद्दा चर्चेत आला असून, लवकरच या प्रकरणावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.