फोटो सौजन्य - Social Media
तालुक्यातील तळेगाव बाजार, मालठाणा खुर्द, मालठाणा बु., मालपुरा, कळमखेड तसेच अकोली रूपराव या शिवारातून खंडाळा फाटा ते अकोली रूपराव या मार्गावर गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे. या जड वाहतुकीमुळे रस्त्याची झपाट्याने दुरवस्था होत असून ती तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी अकोली येथील ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन छेडले. सकाळपासूनच ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. या रस्त्याची वहन क्षमता केवळ १० टन इतकी मर्यादित आहे. मात्र प्रत्यक्षात या मार्गावर ७० ते ८० टन वजनाचे मातीने भरलेले ट्रक दिवस-रात्र धावत आहेत. क्षमतेपेक्षा अनेक पटीने अधिक वजनाची वाहने धावत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडू लागले आहेत. काही ठिकाणी रस्त्याची पृष्ठभाग पूर्णपणे उखडली असून बाजूचे खांदेही खचू लागले आहेत. त्यामुळे लहान वाहनचालकांसह दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
अवजड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे उडणाऱ्या धुळीचा मोठा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. केळी, टरबूज, गहू, मका, हरभरा यांसारख्या पिकांवर धुळीचे थर साचत असल्याने पिकांची वाढ खुंटत आहे. उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याशिवाय, धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
गावकऱ्यांनी सांगितले की, या संदर्भात संबंधित कंत्राटदाराकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट वाहतूक पूर्वीपेक्षा अधिक वाढली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांची मागणी आहे की, तात्काळ अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.






