संग्रहित फोटो
विटा : दुबई व आखाती देशात माल पाठवून चांगला दर मिळवून देण्याचे आमिष दाखवून द्राक्ष व्यापाऱ्यांनी माहुली (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदार भरत दादासो सूर्यवंशी (वय ४८) यांना १५ लाख ८७ हजार ६४८ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी द्राक्ष व्यापारी सलीम सरदार सय्यद, अधिक विठ्ठल पवार (दोघेही रा. विटा, ता. खानापूर), पशुपती रंगनाथ माळी (रा. सावर्डे, ता. तासगाव) व गंगाराम ऊर्फ मुकुंद सुखदेव चव्हाण (रा. मुंबई) या चार द्राक्ष व्यापाऱ्यांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
माहुली येथील द्राक्ष बागायतदार भरत सुर्यवंशी यांची सहा एकर द्राक्ष बाग आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये व्यापारी सलीम सय्यद, पशुपती माळी, अधिक पवार व मुकुंद चव्हाण हे सुर्यवंशी यांच्या द्राक्ष बागेत आले. त्यावेळी त्यांनी तुमचा द्राक्ष माल आखाती देशात पाठवून चांगला दर देतो, असे सांगितले. त्यानुसार सुर्यवंशी यांनी व्यापाऱ्यांना पर्पल काळा हा ७ हजार ५३४ किलो माल प्रत्येकी १२० रुपये किलो दराने व एसएसएन लांबडा हिरवा हा ११ हजार २४ किलो द्राक्ष माल ६२ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांना दिला. त्याची एकूण रक्कम १५ लाख ८७ हजार ६४८ होती.
हे सुद्धा वाचा : पैसे देण्यास नकार देणार्या एकावर ब्लेडने वार; पुणे स्टेशन परिसरातील घटना
संपर्क साधल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे
संबंधित व्यापाऱ्यांनी २ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संशयितांनी सर्व माल बागेतून काढून घेतला. मात्र, सूर्यवंशी यांना पैसे दिले नाहीत. तगादा लावल्यानंतर सलीम सय्यद याने ४ लाख रुपये व दुसरा ४ लाख ५४ हजार १६० रुपये असे दोन धनादेश सुर्यवंशी यांना दिले. त्यातील चार लाखांचा एक धनादेश बँकेतून परत आला. त्यावेळी सुर्यवंशी यांनी त्याच्याशी पुन्हा संपर्क साधल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
हे सुद्धा वाचा : जेजुरी पोलिसांना चोरट्यांचे आव्हान, नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण; 18 दिवसात…
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फिर्याद
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच द्राक्ष उत्पादक भरत सुर्यवंशी यांनी शनिवारी रात्री द्राक्ष व्यापारी सलीम सय्यद, अधिक पवार, पशुपती माळी व गंगाराम उर्फ मुकुंद चव्हाण या चार द्राक्ष व्यापाऱ्याविरुद्ध विटा पोलिसांत फिर्याद दिली. द्राक्षाचा माल घेऊन पैसे न देता १५ लाख ८७ हजार ६४८ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.