भोंदू खरातचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; महिन्यापासून खरात ताब्यात, फलनिष्पत्ती काय?
श्माम बागूल, नाशिक : महिना उलटला, अद्याप पोलीस कोठडी सुटलेली नाही. नाशिकच्या गुन्हेगारी इतिहासातील ही दुर्मिळ व पहिलीच घटना मानावी लागेल. अटकेत असल्यापासून दर चार, दोन दिवसांनी न्यायालयात हजेरी व पोलीस कोठडीत रवानगी जणू काही रूटीन झालेले. त्यामुळे भोंदू खरातची आता पोलीस कोठडी विषयी असलेली भिती नष्ट होण्यास मदत झाली असावी. तसेही त्याची यापुढे सुटका होणे कठीणच. त्यामुळे या खटल्याचा निकाल काय असेल याचा अंदाज बांधणे अधिक सोपे झाले आहे.
खरात पोलीस कोठडीत काय उलगडा अथवा माहिती देतो या विषयी नागरिकांना उत्सूकता लागून आहे. महिनाभरात त्याच्याकडून पोलीसांनी काय काय हस्तगत केले? त्याच्या या कृत्यात आणखी कोण सहभागी ? कोट्यवधीची मालमत्ता कोठून मिळविली ? राजकीय नेत्यांचे काय संबंध? सरकारी अधिकाऱ्यांच्या हजेऱ्या कशासाठी असे एक नव्हे अनेक प्रश्न अजुनही जनतेच्या मनात आहेत व त्याची उत्तरे त्यांना हवी आहेत. परंतु पोलीस व एसआयटी या गोष्टीवर बोलण्यास तयार नाहीत. त्यांच्या ताब्यात असलेल्या खरातच्या मोबाईलचे सीडीआर थेट मुंबईत उपलब्ध होत आहेत, त्यातून सोयीसोयीने दररोज नावे बाहेर आणले जात आहेत.
प्राथमिक शिक्षकांची ५०० पदे रिक्त! भंडारा जिल्ह्यातील प्रकार; एकाच शिक्षकावर ४ वर्गांची जबाबदारी
भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, SITने त्याला लैंगिक शोषणाच्या पाचव्या गुन्ह्यात अटक केली. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हिसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं होत.
खरातशी संबंध जोडले जात असल्यामुळे राजकारणी व सरकारी अधिकाऱ्यांवर एकप्रकारे दबाव निर्माण केला जात आहे. परंतु अजुनही पोलीस व एसआयटीकडून त्याचा खुलासा केला जात नाही. या साऱ्या प्रकरणात इंडी, आयकरने उडी घेतली आहे. त्यांच्या तपासाची कार्यकक्षा वेगळी आहे.
कदाचित त्यांच्या तपासातील मुद्दे सार्वजनिक केले जाणार नाहीत. परंतु ज्यांचा ज्यांचा खरातशी आर्थिक संबंध आला आहे, असे कोण आहेत ते तरी जनतेसमोर आणले पाहिजे. अजून तरी खरातशी संबंधितांना चौकशीसाठी बोलावल्याचे ऐकीवात नाही. तपास यंत्रणा बोलवेल की नाही या विषयी शंका आहे. त्यामुळे खरात एकदा तुरूंगात गेला की, त्याच्या आर्थिक बाबीविषयीच्या तपासही थंडावण्याची शक्यता. कारण
खरातशी ज्यांचा संबंध जोडला गेला त्यात सामान्य व्यक्तीपेक्षाही असमान्य व्यक्तींच अधिक आहेत. अशा असामान्य व्यक्ती समाजासमोर यायला हव्यात. खरातशी त्यांचा संबंध फक्त आर्थिक कारणासाठीच होता की आणखी काही हे जसे स्पष्ट होईल तसेच त्यातून त्यांची महिलांप्रती असलेली मानसिकताही उजागर होण्यास मदत होईल हीच त्यांच्यासाठी मोठी शिक्षा असेल.
सत्तेत व विरोधात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीत सध्या संघटनेच्या पातळीवर शांतता असली तरी, काँग्रेसमध्ये मात्र पक्ष बांधणी व पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या सृजन अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. एरव्ही गटातटाच्या राजकारणातच रमणाऱ्या काँग्रेसमध्ये आज्ञाधारकपणा इतका की, सुजन अभियानाशिवाय या पक्षाला स्थानिक प्रश्न व समस्यांचा जणू विसरच पडला. त्यामुळे जयंती पुण्यतिथी साजऱ्या करण्याइतपतच काम शहरातील नेतृत्वाला शिल्लक राहिले आहे. संघटनेतील सुस्तावलेलापणा बहुधा नेतृत्वाला खटकला असावा व त्यातून ‘सृजन’चा जन्म झाला असावा. या अभियानापुरते का होईना कॉग्रेसवाले एकत्र आल्याचे यात पहायला मिळाले ते काही वेळासाठी. त्यामानाने जिल्हा काँग्रेसच्या युवक आघाडीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कार्यकत्यांनी सुरू केलेले शेतकरी न्याय सत्याग्रह आंदोलनाची सत्ताधारी किती दखल घेतील हा भाग अलिहदा, परंतु जनसामान्यांना यातून दिलासा तरी मिळेल, सुजन पेक्षाही अशी आंदोलने फायद्याची. एरव्ही पक्षात कितीही सूजन राबविले तरी, सूज आलेले कॉग्रेसजन वास्तव स्विकारत नाही तो पर्यंत पक्ष बाळसे धरणे कठीण.
भोंदू खरात, ज्योतिष पाहणारा रविंद्र एरंडे, आयटी कंपनीतील धर्मातर व अत्याचाराचा थेट धर्माशी संबंध जोडून सत्ताधारी पक्षानेच आंदोलन करावे यापेक्षा अधिक हास्यास्पद काहीच नसावे. सरकार त्यांचेच, यंत्रणा व पोलीस त्यांचीच. त्यांच्याच काळात या घटना घडाव्यात व उघड व्हाव्यात. गुन्हेगारही ताब्यात मिळावे याचा उत्सव साजरा करण्याऐवजी त्यानावाने गळा काढण्याच्या प्रकाराबाबत शंकाच घेण्यास वाव अधिक. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनांचे समर्थन अद्याप तरी कोणी केलेले नाही हे त्यातल्या त्यात समाधान. मात्र याच वेळी ज्योर्तिलींग असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या धार्मिक असाहय्यतेचा फायदा घेण्याचा व त्यात मंदिराच्या विश्वस्ताचाच सहभाग असल्याचा प्रकार उघडकीस आलेला असतांना त्याकडे धर्मवेड्यांचे लक्ष गेले नाही याचे आश्चर्यही वाटते. पोलिसांनी स्वतः स्टिंग ऑपरेशन राबवून विश्वस्त पुरुषोत्तम कडलग व त्याच्या दोन पुतण्यांना गजाआड केले.
त्यातून मंदिर व्यवस्थापनातील गैरप्रकाराला आळा बसेल असे मानावयास हरकत नाही. परंतु या साऱ्या प्रकरणाच्या चौकशीत फक्त एकटा कडलगच सहभागी आहे की आणखी कोणी याचा उलगडा अद्याप झालेला नाही. कडलग याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी असलेले संबंध पाहता, त्याच्या या अधर्मीकृत्याला राजकारणाची जोड कोणी दिलेली नाही हे विशेष. तसेही वारकरी संप्रदायाविषयी शरद पवार यांनी केलेले वक्तव्य, त्याला भाजपाच्या हस्तकाकरवी दिले गेलेले उत्तर व पुरूषोत्तम कडलग यांनी तुषार भोसलेला दिलेले प्रत्युत्तर पाहता कडलग याला या प्रकरणात फसविले गेले हा युक्तीवादही काहीअंशी सत्य मानला गेला तरी, देशभरातून आलेल्या भाविकांच्या भावनांशी कडलग यांनी केलेला ‘आर्थिक’ खेळ समर्थनीय नाही. धर्म-धर्म खेळणाऱ्यांचे अजून कडलग याच्याकडे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे त्यांनी पाळलेले मौन देखील आश्चर्यकारक मानावे लागेल.






