फोटो सौजन्य - Social Media
सावन वैश्य | नवी मुंबई:- नवी मुंबई पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या झाल्या आहेत. यातील काही अधिकारी हे मुंबई तर एका अधिकाऱ्याची महामार्ग सुरक्षा रायगड, तर एका अधिकाऱ्याची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. तर अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांना नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त करत पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच सी के मीना यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र ची जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, अशा चर्चांना उधाण आल होत. मात्र आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा पदी वर्णी लागली आहे. तर अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांना शासनाने सह पोलीस आयुक्त पदी पदोन्नती देत नवी मुंबईत कायम ठेवले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयात कार्यरत असलेले विजय खरात यांना नवी मुंबई पोलीस उपयुक्त पदाचा पदभार दिला आहे. तर परिमंडळ 1 चे उपायुक्त पंकज डहाणे यांची मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड राज्य महामार्ग सुरक्षा चे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांना 112 ची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रकटीकरण 1 चे उपायुक्त विशाल ठाकूर यांची नवी मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक केली आहे. तसेच राज्य गुप्तवार्ताचे उपायुक्त म्हणून नियुक्त असलेले योगेश चव्हाण आता नवी मुंबई उपायुक्त म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर अन्न व औषध प्रशासन चे कामकाज पाहणारे पोलीस अधीक्षक, आता नवी मुंबई उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त म्हणून तिरुपती काकडे यांनी जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्याकडे आता राज्य महामार्ग सुरक्षा रायगडचे पोलीस अधीक्षक म्हणून धुरा सोपवण्यात आली आहे. तर परिमंडळ 3 चे उपायुक्त म्हणून कामकाज पाहणारे प्रशांत मोहिते, हे आता उपायुक्त छत्रपती संभाजी नगर म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. तर सी के मीना यांना विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र देण्यात आलं आहे.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली शहरात शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. आणि त्यांचे प्रयत्न विशेषता यशस्वी देखील झाले आहेत. मात्र काही ठिकाणी गुन्ह्यांचं प्रमाण हे कमी होण्याचं नाव घेत नाही. आता नवनियुक्त अधिकाऱ्यांची आयुक्त मिलिंद भारंबे हे कोणकोणत्या ठिकाणी वर्णी लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. जेणेकरून शहरातील गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करून, शहर अधिक शांततामय राहून नागरिक कायद्याच्या चौकटीत गुण्यागोविंदाने राहतील.






