केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार? (संग्रहित फोटो)
पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू पावलेल्या २६ वर्षीय केतन अग्रवालचे प्रकरण आता देशातील सर्वाधिक चर्चित हत्या प्रकरणांपैकी एक बनले आहे. १८ जूनला घडलेली ही घटना सुरुवातीला एक ट्रेकिंग अपघात मानली जात होती. मात्र, ३ आठवड्यांच्या आतच या प्रकरणाने भयानक कटाचे स्वरूप धारण केले आहे. तरुण व्यावसायिकाचा त्याच्या लग्नाच्या अगदी आधी मृत्यू झाला असून, त्याची २० वर्षीय वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
केतनला किल्ल्यावरून खाली ढकलण्याचा कट त्यांनी रचला होता, असा पोलिसांचा दावा आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्या निवेदनांमधून, सिया तिच्या ठरवलेल्या लग्नामुळे नाखूश होती, असे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांनी केतनला संपवण्याचा कट रचला. कॅफेमधील बैठकांदरम्यान हत्येचे नियोजन करण्यात आले. मात्र, हे सर्व केवळ बातम्यांच्या मथळ्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. न्यायालयात अद्याप काहीही सिद्ध झालेले नाही.
पोलिसांची कहाणी न्यायालयात टिकेल का?
कोणत्याही न्यायालयात आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी, पोलिसांच्या कथनाला केवळ ‘आरोपां ‘मधून ‘ठोस पुराव्यां ‘मध्ये रूपांतरित करावे लागेल. कथित प्रेमसंबंध हत्येमागील हेतू सिद्ध करू शकतात. कॅफेमधील बैठका आणि सराव हे कटाचे संकेत देऊ शकतात.
केतन घसरला नाही किंवा त्याने…
याशिवाय, फोन रेकॉर्ड, कपडे, सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन डेटा आणि घटनेनंतरचे वर्तन पुराव्यांची साखळी अधिक मजबूत करू शकतात. परंतु, हे सर्व न्यायालयात तेव्हाच खरे ठरेल, जेव्हा संपूर्ण साखळी एकाच निष्कर्षापर्यंत पोहोचेल की केतन घसरला नाही किंवा त्याने उडी मारली नाही, तर त्याला मुद्दाम ढकलण्यात आले होते.






