सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : मुलगा कोणासोबत आणि कुठे जात आहे, हे माहिती असतानाही मुलाचे अपहरणनाट्य निर्माण करून शासनाची तसेच पोलीस यंत्रणेची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार तानाजी सावंत यांच्यावर तसेच यातील तक्रारदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) गटाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सिंहगड रोड पोलिसांत देत पोलीस प्रशासनाला जाबही विचारला, सर्व सामान्यांसाठी पोलीस इतकी तत्परता दाखवतील का, असेही प्रश्न यावेळी विचारण्यात आले.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगडे यांना हे निवदेन शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे यांनी दिले. यावेळी उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या रेखा कोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस प्रशासन व महाराष्ट्राचे सरकार आमदार पुत्राला शोधण्यासाठी किती तत्परतेने काम करते, हे महाराष्ट्राने पाहिले. परंतू ही तत्परता सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळी देखील असावी, असेही यावेळी शिवसेनेच्या वतीने म्हंटले आहे.
कुटुंबातील भांडणामुळे घरी कोणालाही न सांगता बॅंकॉकला जात असताना तसेच तो कॉलेज कॅम्पसमधून स्विफ्ट गाडीने जात असल्याची माहिती असतानाही सावंत यांनी मुलाचे अपहरणनाट्य घडवून आणले. पोलिसांसह, केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी यात तत्परतेने भूमिका बजावली आणि राजकीय ताकद दाखवित आमदारांनी मुलाला पुन्हा परत माघारी बोलावले. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर झालेला खर्च आमदारांकडून वसूल करावा तसेच पोलीस प्रशासन व सरकारची दिशाभूल केल्याबद्दल अपहरणातील तक्रारदार आणि आमदार सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही निवेदनात म्हंटले आहे.
हे सुद्धा वाचा : पिंपरी हादरली! दोघांवर ब्लेडने सपासप वार; धक्कादायक कारणही आलं समोर
नेमकं प्रकरण काय
दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं चांगलीच खळबळ उडाली. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले नसून, आपल्या मित्रांसोबत बँकॉकला निघाल्याची बातमी समोर आली. मात्र त्यापूर्वी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क करून आपल्या मुलाचं विमान हवेतल्या हवेत फिरवून पुन्हा पुण्याला आणलं. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत.