Mantralay News: मंत्रालयातील ठराविक अधिकाऱ्यांसाठी बदलले निकष; उपसचिवांचा संताप अन् थेट इशारा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यात या महायुतीने बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, मोठा पक्ष ठरला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये चढाओढ सुरु असतानाच आता भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर एकमत झाल्याची माहिती दिली जात आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Elections 2024 : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की शिंदे राहणार? आता महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात येणार?
राज्यात बहुमत मिळाल्यानंतर महायुतीत आता सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादीने अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याची औपचारिकता पूर्ण केली. मात्र, भाजपचा नेता अजून ठरलेला नाही. मात्र, दिल्लीत भाजप हायकमांडच्या बैठकीत सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीमधूनही पसंती दिली जात आहे. मात्र, शिवसेना अजूनही एकनाथ शिंदेंच्या नावावर अडून बसल्याचे समजते.
महायुतीतील एका बड्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन मुख्यमंत्री कोण याचा निर्णय दिल्लीत झाला. त्यात भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने त्यांच्याच पक्षाकडे नेतृत्व देण्याची मागणी लावून धरण्यात आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी अजून आपली ‘ना हरकत’ कळवलेली नाही.
शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही
किमान पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत तरी शिंदे यांनाच अजून काही दिवस तरी मुख्यमंत्रिपदी ठेवावे यासाठी शिवसेना आग्रही आहे. सायंकाळी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत बहुतांश नेत्यांनी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आग्रहपूर्वक मागणी केली.
अमित शहा येणार मुंबईत
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्रिपद भूषवले आहे आणि ते पुढील कालावधीसाठीही मुख्यमंत्री राहण्यास प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपच्या निर्णयावरुन ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. आता मुख्यमंत्रिपदाबाबत तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत. ते मुंबईतच महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करतील. तसेच तीन पक्षांमध्ये मंत्रीमंडळाच्या जागा वाटपचा फॉर्मुलाही मांडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?
या सर्व तिढ्यात सोमवार सायंकाळपासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचीही चर्चा रंगत आहेत. त्यांनी सर्व बैठका,कार्यक्रमही रद्द केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अमित शाहसहित केंद्रीय नेतृत्वाला शिंदेंचे मत राखतच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : विधानसभा निवडणुकीमध्ये 50 पेक्षा कमी जागांवर अडकली गाडी, महाआघाडी झाली महापिछाडी