निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला (फोटो - एक्स)
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात आले असून बंडखोरांनी अर्ज मागे देखील घेतले आहेत. त्यामुळे काही मतदारसंघामध्ये पक्षांना बंडखोरी रोखण्यात यश देखील आले आहे. आता पक्षांकडून सभा घेतल्या जात असून आश्वासनांची सरबत्ती सुरु केली आहे. आश्वासनांचा आणि शब्द देण्याचा पाऊस पडत आहे. दरम्यान, अजित पवार गटाने त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बारामतीसाठी काही खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पुन्हा एकदा त्यांचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनांसह आणि समाजपयोगी प्रकल्प राबवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महायुती सरकारच्या वतीने अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. त्यांचे दर महिना 1500 रुपये महिलांना दिले जात होते. आता त्यांची रक्कम वाढवणार असल्याचे अजित पवार यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितले आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरु ठेवण्यात येणार असून 2100 रुपये दर महा दिले जाणार आहेत.
पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. योजनांमध्ये काही बदल करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांचे काम सांगितलेले. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे, अशी घोषणा सुनील तटकरे यांनी केली आहे.
हे देखील वाचा : मनसेला शिवाजी पार्कवरील दीपोत्सव भोवणार? थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली तक्रार
घोषणापत्र जाहीर करताना अजित पवार म्हणाले की, काल कोल्हापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. आमचा महायुतीचा आणि युतीतील सर्व पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होत आहे. त्याचबरोबर या वर्षी प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. यामुळे मतदारांच्या देखील विकासकामे आणि आश्वासने लक्षात येतील. आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी, रहिवासी, कष्टकरी, युवक व महिला यांच्यासोबत सखोल चर्चा करुन त्यांच्या अपेक्षांना या जाहीरनाम्यामध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार