स्वप्नील राजशेखर यांनी साकारलेला महिषासुर
६०० भागांचा हा टप्पा सोपा नव्हता आणि तो गाठताना काय तयारी केली? या पात्राची दहशत तुम्ही कशी ठेवली आहे? असं विचारल्यावर सर्वात आधी मनसोक्त हसत स्वप्नीलने सांगितले की, ‘खरं सांगू का ६०० पैकी जवळपास ५०० भाग मी भूमिका केली आहे आणि हे काम खरंच खूपच मानसिक आणि शारीरिक थकवा आणणारं असतं कारण त्याचे संवाद, युद्ध यामध्ये खूपच एनर्जी जाते. पण ही भूमिका स्वीकारण्यामागे एक मुख्य कारण होतं ते म्हणजे याचे सेट कोल्हापूरला आहे. हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. दुसरं कारणं म्हणजे ही भूमिका करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. कारण याआधी मी अशी भूमिका केलेली नाही आणि माझ्याआधी जो कलाकार काम करत होता असं रिप्लेस करून मी कधीच काम केलं नव्हतं. त्यामुळे प्रेक्षक स्वीकारतील की नाही अशीही शंका होती. पण आता ६०० भाग पूर्ण होत आहेत तेव्हा वाटतंय की, हे नक्कीच मी पेललं आहे. ही जोखीम मी घेतली आणि ती निभावली याचं समाधान आहे’
या भूमिकेसाठी सुरूवातीपासून काही आव्हानं जाणवली का? या प्रश्नावर स्वप्नील यांनी सांगितलं की, ‘आधी ज्यांनी काम केलं ते मी पाहिलंच नाही. मी माझ्या पद्धतीने महिषासुर साकारण्याचं ठरवलं आणि त्यानुसार सर्वांना आपलंसं करणं हे माझ्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं. अगदी सेटवर काम करणाऱ्या माणसापासून ते प्रेक्षकांपर्यंत. कारण एखादा कलाकार रिप्लेस केल्यानंतर त्याची तुलना होऊ शकतं असं असताना आपलं अस्तित्व निर्माण करणं हे एक आव्हान असतं आणि माझी सुरूवातच इथपासून होती. कधीकधी सुरूवातीला हे काम करताना तर मी कॉलेजच्या दिवसांच्या एकांकिका झोनमध्ये पोहचायचो. पण मग एक सूर मिळाला आणि ही भूमिका करताना खूपच मजा यायला लागली.’
या व्यक्तिरेखेची तयारी करताना काय विचार केला होता? या प्रश्नावर स्वप्नीलने पटकन सांगितले की, ‘ही व्यक्तिरेखा सामान्य नाही. यामध्ये साधे संवाद म्हणतानाही आम्हाला ड्रामा आणावा लागतो तेव्हा ते प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचते आणि जेव्हा मी भूमिका साकारायला घेतली तेव्हाच महिषासुर हा एक खलनायक आहे आणि त्याच पद्धतीने मी त्याच्याकडे पाहत आहे आणि म्हणूनच ती व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने साकारता येणं सोपं झालं. यासाठी मेहनत प्रचंड लागते, एनर्जी लागते. पण काम करताना खूप मजा येते’ याशिवाय त्यांनी सांगितले की, ‘भाषा हा माझ्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. पौराणिक मालिकेत आताचे शब्द येऊ नयेत यावर मी खूप भर देतो, अभ्यास करतो आणि सहकलाकरांनाही त्यासाठी मदत करतो. ऊर्दू वा फारसी, हिंदी शब्द त्यात नसावेत आणि योग्य मराठी शब्दाचा वापर व्हावा याचीही योग्य दखल घेतो.’
जेव्हा नकारात्मक भूमिका स्वीकारली तेव्हा कुटुंबाने कशी प्रतिक्रिया दिली? यावर अगदी मनसोक्त खळखळून हसत स्वप्नीलने सांगितले की, ‘पूर्वीपासूनच घरात अभिनय असल्याने त्याचा फायदा झाला. माझे वडील राजशेखर यांनी कमालीचा खलनायक नेहमीच पडद्यावर रंगवला आहे. त्यामुळे कुटुंबाला त्यात काही वेगळे वाटले नाही. आई तर नेहमीच मायेने काम पाहते आणि बायको कायम खंबीरपणे मी जे काम करतो त्यात साथ देते. पण खरे समीक्षक आहेत ते म्हणजे माझा मुलगा आणि मुलगी. मालिकेत मी काहीही वेगळं करतोय असं त्यांना वाटलं तर ते बिनधास्त मला सांगतात आणि मीदेखील ऐकतो’
महिषासुराची भूमिका साकारताना प्रेक्षकांना बऱ्याचदा तुमचा राग येतो तर असा काही प्रसंग प्रत्यक्षात घडलाय का? यावर स्वप्नीलची प्रतिक्रिया ही अत्यंत थक्क करणारी होती, त्याने सांगितलं की, ‘ आई तुळजाभवानी मालिकेत महिषासुराची भूमिका करताना एक गेटअप असतो आणि जेव्हा मी चाहत्यांसमोर किंवा प्रेक्षकांसमोर जातो तेव्हा त्यांनी मीच महिषासुर आहे हे कळतच नाही. अनेक जण सांगतात की, महिषासुर तुम्ही आहात हे प्रत्यक्षात वाटतच नाही. एकदा तर कार्यक्रमात गेलो आणि तिथे मला मीच महिषासुर आहे हे पटविण्यासाठी चक्क संवाद बोलून दाखवावा लागला होता’
Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे
शुंभा आणि महिषासुर यांचे अधिक सीन असतात तर सोनालीसह कसे ट्युनिंग आहे? यावर ते म्हणाले की, ‘सोनालीची पहिली मालिका होती तेव्हाही मी तिच्याबरोबर काम करत होतो आणि अगदी तेव्हापासून आमच्या दोघांचे ट्युनिंग कमाल आहे. अगदी जेव्हा महिषासुराची भूमिका स्वीकारणार होतो तेव्हाही पहिला फोन मला तिचाच आला होता अगदी काही फिक्सही झाले नव्हते. पण सोनाली म्हणजे एनर्जीचा धबधबा आहे, तिच्याबरोबर काम करताना खूप छान वाटते आणि संवादाचे Give and Take कमाल होते’.
स्वप्नील राजशेखर यांनी महिषासुराची भूमिका इतकी कमालीची वठवली आहे की, प्रेक्षकांना आता त्यांच्याशिवाय कोणत्याही इतर कलाकाराला या भूमिकेत पाहणं शक्य होणार आहे. या मालिकेने अधिकाधिक भागांचा टप्पा गाठावा अशीच मनोकामना व्यक्त करत आम्हीही निरोप घेतला.






