Exclusive: शारदा - गौरी आणि सौदामिनीचा खऱ्या आयुष्यातील बाँड कसा आहे
Exclusive Friendship Day: ऑगस्टमधील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण २ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे आणि सिस्टर्स डे असा योग जुळून आला आहे आणि याच निमित्ताने झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेतील ३ बहिणींची भूमिका साकारणाऱ्या एकता, ट्विंकल आणि नारायणी यांचा बाँड कसा आहे हे जाणून घेण्याची संधी ‘नवराष्ट्र’ला मिळाली. यापैकी शारदा आणि सौदामिनीची भूमिका साकारणाऱ्या एकता आणि सौदामिनीशी आम्ही गप्पा मारल्या.
एकता आणि नारायणीला जेव्हा आम्ही विचारलं की, कृष्णाईच्या लेकी मालिकेतील तुमचा बहिणीचा बाँड दिसून येतोय पण खऱ्या आयुष्यातील तुमचा बाँड कसा आहे? यावर दोघीही म्हणाल्या की, ‘तिघींचा बाँड जसा मालिकेत दाखवला आहे अगदी तसाच आहे.’ नारायणीने यावर पुढे सांगितलं की, ‘डबा शेअरिंगपासून ते अगदी सिक्रेट शेअरिंगपर्यंत अशाच आम्ही एकत्र असतो आणि मज्जा करतो’, तर शारदाच्या भूमिकेतील एकताने सांगितलं की, ‘तिघींचाही बाँड पहिल्या दिवसापासूनच खूप छान झाला. एकमेकींना चिडवणं असो वा तब्बेतीची काळजी घेणं असो आम्ही नेहमी एकत्र असतो. मजामस्ती कायम असते आणि तिघी एकत्र असलो की, सेटवर पण धमाल करतो.’
शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री; Zee Marathiवरील कलाकारांनी शेअर केल्या मनातल्या आठवणी
फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने सर्वात जास्त मस्तीखोर तिघींमध्ये कोण आहे म्हटल्यावर दोघींनीही ‘गौरी अर्थात ट्विंकल यादव’ हेच नाव घेतलं. ट्विंकलची ही पहिली मालिका आहे आणि तिच्यासाठी हे सर्व काही नवं आहे असंही आवर्जून यावेळी एकताने सांगितलं. तर शूटिंगदरम्यान काही अडचण आली तर तिघीही एकमेकींंना विचारतो. नारायणीने सांगितलं की, ‘मला असं काही जाणवलं तर मी नक्कीच ट्विंकलशी बोलेन’ आणि एकता म्हणाली की, ‘ट्विंकलशी आणि नारायणीशी दोघींशीही चांगला बाँड आहे. पण ट्विंकल त्यामानाने नवीन आहे तर तिच्याशी पटकन कनेक्ट होता येतं. कारण तिला जास्त प्रश्न असतात.’
तुमच्यातील बाँडिंग कसं तयार झालं, आधीपासून ओळखत होतात का? असं विचारल्यावर नारायणी आणि एकता दोघीही म्हणाल्या की, ‘एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात आमची भेट झाली होती पण ट्विंकलशी ओळख ही मात्र लुक टेस्टच्या वेळी झाली. पण बाँड तयार व्हायला वेळ लागला नाही.’
फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने एकमेकींना काय खास मेसेज द्याल असं विचारल्यावर नारायणी म्हणाली की, ‘हा बाँड मालिका जसजशी पुढे जाईल तसतसा वाढत जावो आणि मालिका संपल्यानंतरही असाच राहो हीच इच्छा आहे.’ तर एकता म्हणाली की, ‘ट्विंकल आणि नारायणी दोघीही अत्यंत गुणी आणि गोड आहेत. रोज नवनवीन इथे शिकावं लागतं आणि खचून न जाता जबाबदारीने आव्हानं पेलावी. नारायणी तर वयापेक्षा खूपच समजूतदार आहे आणि दोघींना पण खूप शुभेच्छा. यानिमित्ताने एकच सांगेन की, संगतीने खूपच फरक पडतो. त्यामुळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत मैत्री निवडा हे मी आवर्जून सांगेन’ सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. तिघींचा बाँड हे नक्कीच त्यामागील एक कारण आहे!






