हिवाळी अधिवेशनाचा पहिला वादळी दिवस; SIR वरून विरोधकांचा राडा, लोकसभेचे कामकाज ठप्प
Parliament Session News: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार (१ डिसेंबर) पासून सुरुवात झाली. यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानुसारच हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) वरून विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज विस्कळीत झाले. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सभात्याग केला. एसआयआर वरून चर्चेला विरोध नाही. पण त्यासाठी निश्चित कालावधी निश्चित करता येणार नाही, असे सरकारने सांगितले.
आज ( २ डिसेंबर) लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक सुधारणांवर चर्चेसाठी निषेध करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाचे खासदार संसद भवनाच्या मकर गेटजवळ जमून हा निषेध करतील. पण जर सरकार SIRवर चर्चा करू इच्छित नसेल, तर निवडणूक सुधारणांसारख्या व्यापक मुद्द्यावर चर्चा केली जाऊ शकते आणि विरोधी पक्ष या मागणीचा पाठपुरावा करू शकतात. असेही सांगितले जात आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, विरोधी पक्षांच्या गदारोळादरम्यान, लोकसभेने मणिपूर जीएसटी (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५ ला मंजुरी दिली. विरोधी पक्षांच्या घोषणाबाजी दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक, २०२५ आणि आरोग्य आणि सुरक्षा उपकर (राष्ट्रीय सुरक्षा उपकर) विधेयक, २०२५ देखील सादर केले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज विस्कळीत झाले आणि दोन वेळा तहकूब झाल्यानंतर, सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (Parliament Winter Session News)
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार एसआयआर आणि निवडणूक सुधारणांवरील चर्चेला विरोध करत नाही, परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. किरेन रिजिजू यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षांनी सभात्याग केला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष एसआयआरवर त्वरित चर्चा करण्याची मागणी करत असताना रिजिजू यांच्या वक्तव्यामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले. दरम्यान, काँग्रेस खासदार रेणुका चौधरी त्यांच्या गाडीत एक भटका कुत्रा घेऊन संसदेत आल्याने वाद निर्माण झाला, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्यावर नाटक केल्याचा आरोप केला. वादाच्या दरम्यान “आत बसलेले लोक चावतात, कुत्रे चावत नाहीत.” असा टोला रेणुका चौधरी यांनी लगावला.
लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच, काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह विरोधी पक्षांचे सदस्यांनी उभे राहत एसआयआरसह काही निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. नंतर, काही सदस्य सभापतींच्या व्यासपीठाजवळ आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना रचनात्मक भूमिका बजावण्याचे आणि सभागृहाचे कामकाज पुढे चालू ठेवण्याचे आवाहन केले. पण त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने त्यांनी सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. तहकूब झाल्यानंतरही, दुपारी १२ वाजता सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर, विरोधी सदस्यांचा गोंधळ सुरूच राहिला, ज्यामुळे प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तास विस्कळीत झाला.






