नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहे. मात्र, अजूनही काही जागा अशा आहेत की, जिथे पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अमेठी आणि रायबरेली या दोन जागा शिल्लक आहेत. उत्तर प्रदेशातील या दोन जागा एकेकाळी गांधी घराण्याच्या बालेकिल्ला मानल्या जात होत्या. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपने विजय मिळविला. येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला.
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती, जिथून ते जिंकले होते. त्याचवेळी सोनिया गांधी रायबरेलीमधून विजयी झाल्या होत्या, पण आता त्या राज्यसभा सदस्य आहेत. अशा स्थितीत दोन्ही जागा आता गांधी घराण्याच्या हातात राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच यावेळी या दोन जागांवर काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना अमेठी-रायबरेली उमेदवारांबद्दल विचारले असता, त्यांनी याचं उत्तर दिलं आहे. जयराम रमेश यांना विचारण्यात आले की, अमेठी-रायबरेली मतदारसंघातून उमेदवार कोण? याला उत्तर देताना ते म्हणाले की, उमेदवारांबाबत काँग्रेस निवडणूक समिती (सीईसी) निर्णय घेईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी अमेठी-रायबरेलीमधून निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस संघटनेलाही तेच हवे आहे. ते येथून निवडणूक लढवतील, अशी आशा आहे.






